हिंदीसह मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे रितेश विलासराव देशमुख. रितेश देशमुख हा स्वर्गीय विलासराव देशमुखांचा सुपुत्र आहे. रितेशने वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नसला तरीदेखील त्याचे दोन्ही भाऊ अमित व धीरज देशमुख हे राजकारणात सक्रिय आहेत. विलासराव देशमुख यांचे निधन होऊन आज इतकी वर्षे झाली असली तरीदेखील त्यांच्या आठवणीत त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता हळहळतोच. अशातच मुलगा रितेशही आपल्या वडिलांच्या आठवणीत हळहळला.
रितेशने नुकतीच देवयानी पवार यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने कुटुंब, करिअर याचसह मनोरंजन क्षेत्राविषयी भाष्य केले. या मुलाखतीत रितेशला त्याच्या आईबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी रितेशने उत्तर देत असं म्हटलं की, “माझ्या आई या गृहिणी होत्या. त्यांनी उत्तम घर सांभाळलं, त्याचबरोबर आमचं शिक्षणही केलं. आज अमित भैय्या व धीरज हे राजकारणात आहेत आणि मी मनोरंजन क्षेत्रात आहे. पण आमचं शिक्षण होण्यात आमच्या वडिलांपेक्षा आईचा हात अधिक आहे आणि हेच खूप महत्त्वाचे आहे की, तुम्ही तुमचं घर कसं राखत आहात?. त्यावेळी आईने आम्हाला जाणीवपूर्वक इंग्रजी शाळेत घातलं.”
यापुढे रितेश वडिलांच्या आठवणीत भावुक होत असं म्हणाला की, “आज वडील जाऊन १२ वर्षे झाली. पण या १२ वर्षात सर्वात मोठी पोकळी कुणाच्या आयुष्यात आली असेल तर ती आईंच्या आयुष्यात. कारण मुलांची लग्न झाली. त्यानंतर आम्ही आमच्या कामात व्यस्त झालो. पण ती एकटीच राहिली. तरीसुद्धा या तिच्या त्या वयात त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि आता त्या लातूरमध्ये शेती करत आहेत.”
यापुढे रितेशने असं म्हटलं की, “आई नवनवीन प्रगतशील तंत्रज्ञाचा व प्रयोगाचा वापर करुन लातूरमध्ये शेती करत आहेत आणि याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. या वयात त्या एक स्वतंत्र उद्योजिका आहेत याबद्दलही मला त्यांचा खूपच अभिमान आहे आणि या सर्वात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या या प्रपंचामध्ये त्यांनी मी, अमित भैय्या किंवा धीरज यापैकी कुणा एकाचीही मदत घेतलेली नाही किंवा आमचं मतही विचारलं नाही. त्यांनी त्यांचा त्यांचा निर्णय घेतला आणि त्या आता ते सगळं उत्तम करत आहेत.”