Rakhi Sawant On Dharmendra Death : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर तातडीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे शेवटचे दर्शनही चाहत्यांना उपलब्ध करुन देण्यात आले नाही. यामुळे धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. धर्मेंद्र यांचे अनेक चाहते त्यांच्या घराबाहेर ढसाढसा रडताना दिसले. देओल कुटुंबीयांनी धर्मेंद्र यांच्या आजारपणाची, निधनाची बाब खासगी ठेवल्याने हा नाराजीचा सूर चाहत्यांमध्ये अधिक असल्याचा पाहायला मिळाला. यावर आता लोकप्रिय अभिनेत्रीनेही सवाल उपस्थित केला आहे. धर्मेंद्र यांचे शेवटचे दर्शन घेता आलं नसल्याने अभिनेत्री राखी सावंतनेही प्रश्न विचारला.
चाहत्यांना धर्मेंद्र देओलला शेवटचे पाहू न दिल्याबद्दल राखी सावंतने पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला. ती म्हणाली की, “अभिनेत्याला ज्या राज्य सन्मानाने निरोप द्यायला हवा होता, देओल कुटुंबाने तसे केले नाही”. अभिनेत्रीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “धर्मेंद्र संपूर्ण देशाचे हिरो होते, मोठ्यांपासून लहान मुलांपर्यंत त्यांच्या अभिनयाचे चाहते होते. बिग बॉसच्या वेळी मी त्यांच्यासोबत स्टेजवर डान्सही केला, पण त्याच्या चाहत्यांना त्यांची शेवटची झलकही दिली गेली नाही. ते केवळ देओल कुटुंबाचा भाग नव्हते. मला मान्य आहे की ते तुमचे वडील होते, आम्ही त्यांचा आदर करतो, पण ते तुमचे वडील होण्यापूर्वी ते देशाचे हिरो होते, ते आमचे हिरो होते”.
ती पुढे म्हणाले की, “ज्याप्रमाणे श्रीदेवी आणि राजेश खन्ना यांना राज्य सन्मानाने निरोप देण्यात आला होता. तसाच प्रकार धर्मेंद्र यांच्यासोबत झाला नाही. त्यांच्या स्मरणार्थ एक फूलही वाहता आले नाही. देओल कुटुंबाने असे का केले हे आम्हाला माहित नाही, परंतु मला असे म्हणायचे आहे की ते आमचे हिरो होते आणि ते या सन्मानास पात्र होते. देशभरात त्यांचे लाखो चाहते आहेत, ज्यांना त्यांना शेवटचे पाहायचे होते”.
याशिवाय राखीने सांगितले की, “दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. मला अनेकांनी सांगितले. ते स्वतः स्वप्नात माझ्याकडे आले. तेथील रुग्णालयातील डॉक्टरांचीही भाषणे झाली. त्याच्या चाहत्यांना त्यांना भेटू दिले नाही याचे मला खूप वाईट वाटले”. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे राखीने वाढदिवसाचे सेलिब्रेशन पुढे ढकलले होते. यादरम्यान, तिच्या वाढदिवसाविषयी बोलताना राखीने सांगितले की, “माझा वाढदिवसही २५ नोव्हेंबरला होता आणि पार्टीची पूर्ण तयारी झाली होती. मात्र त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच आम्ही पार्टी रद्द केली”.





