Marathi artists payment delay : कलाकारांच्या थकलेल्या मानधनाबाबत आजकाल बरीच चर्चा सुरु असलेली पाहायला मिळते. अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर या प्रकरणावर भाष्य करताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेता शशांक केतकरने त्याच्या पाच वर्षांपासून थकलेल्या मानधनाबाबत पोस्ट शेअर करत आवाज उठविला. यापाठोपाठ आता आणखी एका मराठी अभिनेत्री, निर्मातीने मानधनाबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. अभिनेत्री असताना न मिळणाऱ्या मानधनाबाबत आणि निर्माती असताना होणाऱ्या नुकसानाबाबत तिने स्पष्टपणे भाष्य केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मनवा नाईक.
अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीत मनवाने निर्माते आणि कलाकार यांच्या थकीत मानधनाबाबत भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “चॅनेल्स अगदी कॉर्पोरेट पद्धतीने काम करतात. कलाकारांच्याबरोबरच्या डील्स या ९० दिवसांच्याच असतात. यात खरंतर खूप प्रॉब्लेम आहेत. एक आहे, निर्मात्याची नियत पैसे द्यायचे आहेत की नाही. दुसरं म्हणजे, त्याचे प्रॉब्लेम्स. आपण केलेल्या प्लॅननुसार सगळं झालं आहे का?. तिसरं आहे, काही अचानक आलेले प्रसंगं, ज्यामुळे त्याने केलेल्या प्लॅन्सनुसार गोष्टी घडल्या नाहीत. चौथं म्हणजे जीएसटी, टीडीएस भरले की नाही. याबद्दल एका गोष्टीवरुन सांगू शकत नाही. यांत अनेक प्रॉब्लेम्स असतात. इंडस्ट्रीत असेही निर्माते आहेत, जे अगदी चोख व्यवहार करतात. वेळच्या वेळी पैसे देतात आणि यासाठी ते इंडस्ट्रीत जाणले जातात. मग यांना ९० दिवसांचा प्रॉब्लेम नसतो का?, माझं म्हणणं आहे की जेवढी स्क्रिप्ट (संहिता) महत्त्वाची आहे, तेवढीच एक्सल शीटसुद्धा महत्त्वाची आहे. पहिल्याच दिवशी एक्सल शीट नीट बनली नाही, तर ती कधीच बनत नाही. मग तोटा कसा भरुन काढायचा हा प्रश्न निर्माण होतो. माझ्याबरोबरसुद्धा हे झालं आहे, माझ्याही एक्सल शीट अनेकदा चुकल्या आहेत. पण हे एक सतत शिकण्याचं काम आहे”.
यानंतर मनवा म्हणाली, “मी निर्माती झाल्यानंतर राकेश सारंगने मला फोन करून सांगितलं होतं की, एकूण १०० रुपयांमधील आपले फक्त १० रुपयेच असतात. तेवढेच आपण घ्यायचे आणि उरलेले आपण द्यायचे असतात. हे माझ्या डोक्यात अगदी फिट बसलं आहे. तुमचे जेवढे पैसे आहेत, तेवढेच तुम्ही घ्या. समोरच्याला ९० दिवसांनी द्यायचे आहेत, त्यामुळे इथले पैसे तिथे द्यायचे. इथले तिथे द्यायचे… असं करायचं नाही. खूप प्रॉब्लेम असतात”.
आणखी वाचा – भरजरी साडी, पारंपरिक दागिने अन्…; ‘कोण होतीस तू…’ फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, पेशवाई लूकची चर्चा
शेवटी ती म्हणाली, “मी एकट्या निर्मात्यांना दोष देणार नाही. शो ऑन-एअर जाणार असतो. ठरलेल्या दिवसांमध्ये शूटिंग होत नाही. अनेकदा तारखांचे प्रॉब्लेम असतात. आज जे ठरवलं आहे, ते होत नाही. मग ते उद्यावर जातं. मग प्रत्येक गोष्टीची किंमत वाढते. असे काही ऐनवेळी येणारे प्रॉब्लेम्सदेखील असतात. यात कुठे निर्माता दबला जाईल, हे सांगता येत नाही. हे माझ्याबद्दलही झालं होतं. माझंही नुकसान झालं आहे. पण यातून बाहेर येण्याचा मार्ग काढणं महत्त्वाचं आहे”.





