‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रीतम त्या गावाकडच्या मुलीचा फोटो पाहत असतो तितक्यात तिथं आदित्य येतो आणि तो फोटो पाहून त्याला चांगलाच दम भरतो. मात्र प्रीतम त्यावेळी तो फोटो पारूच्या मैत्रिणीचा असल्याचं सांगत बाजू सांभाळून घेतो. तर इकडे पारू तिच्या हाताला भाजलेले असतानाही किचनमध्ये भांडी आवरत असते ते पाहून सावित्री आत्या पारूला खूप ओरडतात आणि सांगतात की अजून तू तुझ्या हाताला मलमही लावलेला नाही आहेस. तू आधी घरी चल असं म्हणून तिला घरी घेऊन येतात. तर अहिल्यादेवी श्रीकांतशी बोलत असतात तेव्हा म्हणतात की, आज पारूमुळे माझी वटपौर्णिमेची पूजा अगदी योग्यरीत्या संपन्न झाली. आजही पारूचं माझ्या मदतीला धावून आली आणि घडला प्रकार त्या श्रीकांतला संगतात. तेव्हा श्रीकांतही पारूचं कौतुक करतो आणि तेव्हा अहिल्यादेवी नाराजी व्यक्त करतात की, तिला हाताला भाजलं असून ती दिवसभर काम करत आहे हे माझ्या लक्षातही आलं नाही. (Paaru Serial Update)
त्यानंतर जेव्हा सावित्री आत्या पारुला घेऊन घरी येतात तेव्हा घरी मलम संपलेलं असतं म्हणून मारुती व गणी ते मलम आणायला बंगल्याबाहेर पडतात. त्यावेळेला सावित्री आत्या पारूला झोपून आराम करायला सांगतात. तितक्यातच पारूच्या गळ्यातील मंगळसूत्र सावित्री आत्याच्या नजरेस पडतं. सावित्री आत्या पारूला म्हणतात की, हे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कुठून आलं?, त्यानंतर त्या स्वतःच तू हरीशसाठी आज वडाची पूजा केलीस ना?, त्याच्या ताटातलं उष्ट अन्न खाल्लस ना?, असं विचारतात. यावर पारू ढसाढसा रडू लागते आणि ती काहीच बोलत नाही. ऍडशूटमधील हरीश सरांबरोबरचं लग्न तू खरं मानलं असंही त्या म्हणतात. त्यानंतर सावित्री आत्या पारूला आराम करायला सांगतात आणि तिथून निघून जात असतात. तितक्यात पारू त्यांना थांबायला सांगते आणि म्हणते की, हे मी हरिश सरांसाठी केलं नाही. वडाची पूजा त्यांच्यासाठी केली नाही आणि त्यांच्या ताटातलं उष्ट अन्नही खाल्लेलं नाही तर त्यावर सावित्री आत्या म्हणतात, मग तू सगळं कोणासाठी केलं आणि हे मंगळसूत्र कोणाचा आहे?, तू रोज या मंगळसूत्राची पूजा करतेस, हे नक्की कोणाचा आहे?, असा तिला सवाल करतात.
त्यावर पारू हे मंगळसूत्र आदित्य सरांच्या नावाचं आहे. त्या ऍड शूटवेळी हरीश सरांबरोबर नव्हे तर आदित्य सरांबरोबर माझं लग्न झालं आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे हे लग्न मी खरं मानलं आहे. त्यामुळे मी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र हे मरेपर्यंत काढणार नाही. हे ऐकल्यावर सावित्री आत्याला खूपच राग येतो. सावित्री आत्या म्हणतात हे लग्न खरं मानून तुला स्वतःचं आयुष्य उध्वस्त करुन घ्यायचं आहे का?, असं म्हणत तिच्यावर हात उगारतात मात्र तितक्यातच त्या थांबतात. तेव्हा पारू म्हणते की मारा मला. माझी आई असती तर मला सुद्धा तिने असंच मारलं असतं. माझी चूक आहे मला सगळेजण स्वार्थी म्हणतील. आदित्य सरांच्या पैशासाठी हे सगळं केलं असल्याचंही म्हणतील पण किती झालं तरी मी किर्लोस्कर घराण्याची सून आहे आणि मी माझं कर्तव्य निभावणार.
तर मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दामिनी अहिल्यादेवीना काही तरी सांगते तर दुसऱ्या दिवशी पारू अचानक येऊन अहिल्यादेवींच्या पायावर डोकं ठेवते. मात्र अहिल्या देवी तिथून उठून सरळ निघून जातात. आता अहिल्यादेवींना नेमका कशाचा राग आला असणार?, दामिनीने असं त्यांना काय सांगितलं?, हे सगळं मालिकेच्या आगामी भागात पाहणं रंजक ठरणार आहे.