Ahilyadevi Kirloskar and Shrikant Kirloskar : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका खूप गाजली. मात्र अल्पावधीतच कोणताही शेवट न करता या मालिकेने निरोप घेतला ज्यामुळे चाहतावर्गात नाराजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला. गेल्या दोन वर्षांत ‘पारू’ मालिकेतील सगळी पात्र बरीच गाजली. पारू आणि आदित्य म्हणजे शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. इतकंच नाहीतर इतर पात्र म्हणजे श्रीकांत, अहिल्यादेवी, प्रिया या पात्रांनाही विशेष पसंती मिळाली. पारू मालिकेनंतर आदित्य म्हणजे प्रसाद ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसला. यापाठोपाठ आता पारू मालिकेतील आणखी एक जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. ही जोडी म्हणजे श्रीकांत आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर. म्हणजेच विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक.
‘पारू’ मालिकेत विजय आणि मुग्धा यांनी सासू-सासऱ्यांची भूमिका बजावली. त्यांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. कोणीतीही मालिका नाहीतर एका नाटकातून हे दोघे रंगमंच गाजवायला सज्ज झाले आहेत. विजय पटवर्धन यांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाला, “पहिली कार…”
विजय यांनी मालिकेतील श्रीकांत आणि अहिल्यादेवी या भूमिकेतील फोटो शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “नमस्कार मंडळी, ‘झी मराठी’वरील ‘पारू’ ही मालिका अत्यंत गाजली. त्या मालिकेतील पात्रं जणूकाही तुमच्या घरातलीच जिवाभावाची माणसं झाली होती. त्यांची सुख दुःखं तुम्ही जवळून बघितली. अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर या आदित्यच्या आई वडिलांना आणि पारूच्या सासू सासऱ्यांना तुम्ही भरभरुन प्रेम दिलं, आशीर्वाद दिले. दुर्देवाने ती मालिका संपली. कशी? का? कारणं काय? याच्याकडे थोडं दुर्लक्ष करुया. जे होतं ते चांगल्यासाठी म्हणूया आणि सर्वांचं सगळं चांगलं होऊ द्या अशी प्रार्थना करुन नव्याने सुरुवात करु”.
आणखी वाचा – ‘कमळी’ मालिकेत मोठा TWIST! आजीचा विश्वासघात, कमळीला कानाखाली मारली अन् घराबाहेर काढलं
शेवटी विजय यांनी पोस्ट शेअर करत नाटकाबाबत म्हटलं, “कारण, अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि श्रीकांत किर्लोस्कर येत आहेत नव्या रुपात सौ. आशालता अनंत जोशी आणि श्री अनंत माधव जोशी उर्फ धुरंधर बनून. ते गेले आहेत त्यांच्या मुलीबरोबर ट्विंकल बरोबर, परदेशात सुट्टी एंजॉय करायला. ते कुठल्या देशात गेले आहेत? तिथे त्यांना कोण माणसं भेटतात ? ही सुट्टी ते कशी एंजॉय करतात ? हे पहायला मिळणार आहे, सवाई गंधर्व निर्मित, अभिजात प्रकाशित, भरत दाभोळकर लिखित आणि दिग्दर्शित, “कॅरी ऑन स्पायगिरी” या घराच्या दिवाणखान्याच्या चौकटीतून बाहेर आलेल्या जबरदस्त नाटकात. तर भेटूया नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला”.





