vijay patwardhan wife : मराठी कलाविश्वात अशी बरीच कलाकार जोडपी आहेत ज्यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलं आहे. या जोड्यांपैकी एक म्हणजे विजय पटवर्धन आणि वृषाली पटवर्धन. अनेक मालिका, नाटक, चित्रपट यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत या जोडीने रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. सध्या विजय पटवर्धन झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मालिकेत ते आदित्यच्या वडिलांच्या भूमिकेत म्हणजेचं श्रीकांत किर्लोस्कर ही भूमिका साकारत आहेत. पटवर्धन जोडप्याला सिनेसृष्टीत काम करत असताना वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणींचा सामना हा करावा लागला.
विजय पटवर्धन व त्यांच्या पत्नी वृषाली यांनी नुकतीच ‘रसिकमोहिनी’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी वृषाली यांनी त्यांच्या आजारपणाचा कठीण काळ सांगितला. वृषाली म्हणाल्या, “मला दुसऱ्या स्टेजच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. ज्यावेळी स्कॅनिंगचा रिपोर्ट आला तेव्हा फक्त तीन गाठी दिसल्या होत्या. पण, आठवड्याभराने जेव्हा माझं ऑपरेशन करण्यात आलं तेव्हा २९ गाठी होत्या. डॉक्टरांनी बरणीभरुन काढलेल्या त्या गाठी माझ्या दादाच्या हातात आणून दिल्या होत्या कारण लॅबमध्ये त्या गाठींची पुढील तपासणी होणं बाकी होतं. ज्यावेळी माझं ऑपरेशन होतं त्यावेळी तो (विजय पटवर्धन) शूटिंगला होता. खरंतर, मीच त्याला शूटिंगला पाठवलं होतं. मी निवांत होते, फार गोष्टी मनावर घेतल्या नव्हत्या”.
“ऑपरेशनच्या आदल्या दिवशी भूलरोग तज्ज्ञ मला भेटायला आले होते. त्यांनी मला काय-काय होईल याची माहिती दिली. कोणत्या गोळ्यांची एलर्जी वगैरे नाही ना असं सगळं विचारलं. तेव्हा मी त्यांना म्हणाले होते, एलर्जी वगैरे काही नाही फक्त माझी इतकी ऑपरेशन्स झाली आहेत की, साधारण माणसाला भूल देण्यासाठी तुम्ही जर ५ एमएल औषध वापरलं जातं तर मला ते औषध १० एमएल लागेल. माझं उत्तर ऐकून डॉक्टर हसायला लागले होते”, असा आजारपणातील गमतीशीर किस्सा त्यांनी सांगितला.
आणखी वाचा – ‘शिवा’ मालिका बंद होणार?, पूर्वा कौशिकच्या ‘त्या’ इंस्टाग्राम स्टोरीने चर्चांना उधाण, प्रेक्षकांचीही नाराजी
नर्मदा परिक्रमेबद्दल सांगताना अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “ऑपरेशन झाल्यानंतर कॅन्सरवरील पुढची ट्रीटमेंट सुरु असताना मी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचं ठरवलं. मी डॉक्टरांना विचारलं होतं, त्यांचा सल्ला घेतला. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी बसने ही परिक्रमा पूर्ण करायचं ठरवलं. मी ज्या संस्थेकडून गेले होते त्यांनीही माझी खूप काळजी घेतली. जानेवारी २०२५ मध्ये मी परिक्रमा पूर्ण कैली. ही यात्रा करण्यामागे अनेक कारणं होतं. माझ्या वडिलांना अचानक कॅन्सरचं निदान झालं होतं, त्यात त्यांचं निधन झालं. त्यानंतर मलाही कॅन्सरचं निदान झालं. यातून आम्ही सावरलो नाही तोपर्यंत माझ्या दादालाही कॅन्सरचं निदान झालं. त्यामुळे कितीही उपचार सुरु असले तरीही मला स्वत:साठी एक वेळ हवा होता. मला एकटीलाच जायचं होतं. त्या संपूर्ण प्रवासात मी डायरी लिहायचे. घरी येऊन मी विजयला जेव्हा ते सगळं दाखवलं तेव्हा तो म्हणाला आपण याचं पुस्तक करुयात का? मग तिथून पुस्काची संकल्पना पुढे आली”.





