मराठी सिनेसृष्टीत अशी बरीच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर बऱ्याच न पटणाऱ्या मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य केलं आहे. सामाजिक मुद्द्यांवर संतप्त प्रतिक्रिया देत ही कलाकार मंडळी सोशल मीडियावर बरेचदा चर्चेत असतात. लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा गोडबोले बरेचदा सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना दिसते. अशातच मुग्धाने सोशल मीडियावर घाणेरड्या भाषेत कमेंट करणाऱ्या ट्रोलर्सला खडेबोल सुनावले आहेत. मुग्धाने नुकतीच ‘आरपार’ या युट्युब चॅनेलतर्फे अभिनेत्री क्षिती जोग हिच्याशी संवाद साधला. (mugdha godbole on kshitee jog post)
मुलाखतीदरम्यान क्षितीने सांगितलेला एक मुद्दा चर्चेत आला आहे. यावेळी क्षितीने मंगळसूत्र न घालण्यावरुन भाष्य करत हा प्रश्न विचारणाऱ्यांना टोला लगावला आहे. क्षितीचा हा प्रेमी सोशल मीडियावर शेअर करताच अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, या पोस्टवर सर्वाधिक कमेंट या वाईट विचारसरणी असलेल्या लोकांनी केल्या होत्या. या वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर मुग्धा चांगलीच संतापली आहे. मुग्धाने फेसबुकवरुन पोस्ट शेअर करत कमेंट करणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

“हे रील नेहमीप्रमाणे मी इंस्टाग्रामवर पोस्ट केलं. शनिवारी एपिसोड येणार म्हणून गुरुवारपासून त्याचं प्रमोशन सुरु होतं. हा व्यवसायाचा भाग आहे. मुद्दा हा आहे की इंस्टाग्रामवर या रील खाली साधारण ३००च्या वर कमेंट्स आहेत आणि त्यातल्या बहुतेक पुरुषांच्या आहेत. त्या अत्यंत गलिच्छ भाषेत, घाणेरड्या पद्धतीने लिहिलेल्या आणि अश्लील अश्लाघ्य आणि बीभत्स आहेत. आश्चर्य वाटावं की नको असाही आता प्रश्न पडतो. क्षितीच्या पिढीतल्या अनेक बायका रोज घराबाहेर पडताना मंगळसूत्र घालत नाहीत. त्याला अनेक कारणं आहेत. आवडत नाही. चोरांची भीती वाटते”
पुढे तिने लिहिलं आहे की, “प्रश्न हा आहे की गळ्यात मंगळसूत्र घालावं का नाही, हा त्या स्त्रीचा वैयक्तिक प्रश्न असावा का? का नाही? इतक्या बेसिक मुद्द्यावर आपण अजूनही एवढी चर्चा करतो?, इतक्या घाणेरड्या कमेंट्स करणारे पुरुष घरात आपल्या बायकांकडून काय काय अपेक्षा करत असतील? आम्ही दैनंदिन मालिकांमध्ये जेव्हा असं काही लिहितो तेव्हा कुठल्या काळात जगता आहात. हे प्रश्न नाही आहेत लोकांचे वगैरे म्हणणाऱ्या सगळ्यांना मला सांगावं वाटतं की, ते कमेंट्स वाचा. काळ बदलला आहे. विचार नाहीत. खूप मोठ्या प्रमाणावर बदललेले नाहीत. कित्येक कमेंट्स आम्ही डिलीट केल्या आहेत, कराव्या लागल्या”, असं म्हणत राग व्यक्त केला आहे.