मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग आणि अभिनेता हेमंत ढोमे. क्षिती व हेमंतच्या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही जोडी एकत्र असलेली पाहायला मिळत आहे. खऱ्या आयुष्याबरोबर वैयक्तिक आयुष्यातही ही जोडी नेहमीच एकत्र असते. क्षिती व हेमंत दोघांनीही २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांच्या सुखी संसाराल ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. एकमेकांना समजून घेत दोघांचा सुखी संसार सुरु असलेला नेहमीच पाहायला मिळतो. (Kshitee Jog answers to trollers)
क्षितीने आजवर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. नुकतीच क्षितीने आरपार या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना तिने टीका करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे. क्षिती यावेळी असं बोलत आहे की, “लग्नानंतरच्या एक-दीड वर्षांनंतर मी कुठेतरी समारंभाला गेले होते तेव्हा मी मंगळसूत्र घातलं नव्हतं. तेव्हा मला विचारलं, ‘तू मंगळसूत्र नाही घालत?, तुझं नुकतंच लग्न झालं आहे ना?”.
पुढे क्षिती म्हणाली, “मी म्हटलं, त्याला माहित आहे मी त्याची बायको आहे आणि मला माहित आहे तो माझा नवरा आहे. तुला माहित असो किंवा नसो. ते घातल्याने असं काय होणार आहे. मंगळसूत्र हा एक खूप सुंदर दागिना आहे. मला मंगळसूत्र घालायला खूप आवडतं पण ते माझ्या मनावर आहे. माझ्या मनात असेल तेव्हा मी साडी, गजरा, टिकली हे सर्व घालून तयार होते. आणि नाहीतर नाही”.
पुढे ती असंही म्हणाली की, “पण मी हे तुमच्यासाठी करत नाही. हे मी माझ्यासाठी करते. मला माहित आहे माझं लग्न झालं आहे. मंगळसूत्र घातलं काय की नाही घातलं. या गोष्टी तुम्ही त्याला नाही विचारत. अरे तुझं लग्न झालं आहे, ती मुलगी किती छान दिसते, असं तू का म्हणालास?, तो सहज बोलून जातो. ते चालतं. असे विचार करणाऱ्या लोकांकडे खूप वायफळ वेळ असतो. त्यांच्या आईने वेळीच दोन धपाटे घातले असते तर अशी विचार करायची वेळ आली नसती”.