छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या लाडक्या मालिका असतात. या मालिका अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. अशातच ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मात्र गेला काही काळ ‘झी मराठी’ वाहिनीवरील या मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कुठेतरी कमी पडत आहेत. त्यामुळे या वाहिनीच्या मालिका टीआरपीच्या शर्यतीत खाली घसरताना दिसत आहेत. (Nava Gadi Nava Rajya Serial Off Air)
टीआरपी वाढवण्यासाठी ‘झी मराठी’ वाहिनी नवनवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. मात्र त्यासाठी जुन्या मालिका बंद केल्या जात आहेत. अशातच आता आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ती मालिका म्हणजे ‘नवा गडी नवं राज्य’ होय. अभिनेत्री पल्लवी पाटील व अभिनेता कश्यप परुळेकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘नवा गडी नवं राज्य’ लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. दोन दिवसांपूर्वी मालिकेचं शूटिंग संपलं असून डिसेंबर महिन्यातच मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याची माहिती मिळत आहे.
लोकप्रिय मालिकांच्या यादीत अव्वल स्थानावर ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका होती. ही मालिका जेव्हापासून सुरु झाली आहे तेव्हापासूनच या मालिकेला चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या मालिकेतील राघव व आनंदीच्या जोडीने तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. गावाकडून मुंबईत येऊन आनंदीने कसा आपला संसार संभाळला, कशी माणसं जोडली हे पाहणं मालिकेत रंजक ठरलं. आता मालिकेचा शेवट अत्यंत सुंदर होणार असून लवकरच आनंदीला बाळ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे.
मालिकेतील कलाकारांनी एकत्र फोटो शेअर केले आहेत. कर्णिक व पाटकर कुटुंबीयांनी एकत्र वेळ घालवलेले काही फोटो कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यांत मालिकेतील कलाकारंनी धमाल केलेली पाहायला मिळत आहे. याशिवाय मालिकेतील कलाकार वर्षा दांदळे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सहकलाकारांसह खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्याबरोबरच्या सेटवरील प्रत्येक कलाकाराचं भरभरून कौतुकही केलं आहे. ही प्रेक्षकांची आवडती मालिका निरोप घेणार असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.