महाराष्ट्राच्या राजकारणावर आधारित एका अभिनेत्याच्या कवितेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अभिनेता, कवी संकर्षण कऱ्हाडेच्या राजकीय वातावरणावर आधारित संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेत एक सुंदर अशी कविता सादर केली आहे. या कवितेचं आणि संकर्षणचं सर्वच स्तरातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, विनोद तावडे, आशिष शेलार या दिग्गज राजकीय मंडळींनी फोन करुन संकर्षणच्या कवितेचं कौतुक केलं. (Raj Thackeray Appreciate Sankarshan karhade)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर अभिनेत्याला थेट शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण दिलं. हा सगळा अनुभव संकर्षणने ‘एबीपी माझा’शी संवाद साधत शेअर केला. राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट देत तिथे घडलेल्या भेटीचा किस्सा त्याने शेअर केला आहे. यावेळी राज ठाकरे यांच्या घरी संकर्षणचं कौतुक कसं झालं, आणि तिथवर पोहोचेपर्यंत संकर्षणच्या मनात सुरु असलेल्या धाकधूकबद्दलही तो स्पष्टपणे बोलला.
यावेळी राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यानचा किस्सा सांगत संकर्षण म्हणाला, “मला राज साहेबांचा फोन आला आणि त्यांनी मला आज सकाळी ११ वाजता भेटायला बोलावलं. त्या दिवशी सकाळी ७ वाजता मी मीरा रोडहून माझ्या घरातून बाहेर पडलो. ते भेटल्यावर पहिल्यांदा काय म्हणतील या विचारात मी होतो. वेळेच्या आधी अडीच तास शिवाजी पार्कात फिरत होतो. का तर मला फार धाकधूक होती. मी त्यांच्या घरात पोहचल्यावर घरच्या ग्रुपवर मेसेज टाकला की मी त्यांच्या घरात येऊन बसलो आहे. तेव्हापासून माझे बाबा सारखे बीपी चेक करत होते. आणि मी हे जाऊन राज साहेबांना सांगितलं. त्यांच्या घरातून बाहेर पडताना त्यांनी मला मिश्किलपणे म्हटलं की, “घरच्यांना सांगा सुखरुप बाहेर पडलो आहे”.
यापुढे संकर्षणने असेही म्हटलं की, “राज ठाकरे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला ताईदेखील होत्या. मी त्यांच्याशी बोलताना एकदाही त्यांनी मला तू असं का लिहिलं, तसं का लिहिलं काहीही विचारलं नाही. त्यांनी माझ्याशी नेहमीसारख्या गप्पा मारल्या. कुठे राहत आहेस?, तुझं कसं चाललंय?, नाटक काय म्हणत?, घरी कोण कोण असतं?, सिनेमा, राजकारण, भारत, महाराष्ट्र अशा सगळ्या प्रकारची चर्चा त्यांनी अगदी आनंदाने केली”.