छोट्या पडद्यावरील मालिकांशिवाय अनेक रिअॅलिटी शोला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते. रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांसह सूत्रसंचालन करणाऱ्या कलाकारांनाही यातून प्रसिद्धी मिळते. अशीच एक लोकप्रिय टीव्ही सूत्रसंचालक म्हणजे मिनी माथुर. अनेक चाहते मिनी माथूरचा चेहरा कधीही विसरू शकत नाहीत. मिनीने टीव्हीवर अनेक मोठे रिॲलिटी शोजचे सूत्रसंचालन केले आहे. ‘इंडियन आयडॉल’ या प्रसिद्ध रिॲलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्ये दिसलेल्या मिनीने या शोच्या ६ सीझन्सचे सूत्रसंचालन केले. त्यामुळे तिची लोकप्रियता आजही कायम आहे.
२८ वर्षांचा सूत्रसंचालनाचा अनुभव असलेल्या मिनीने “आजकाल सूत्रसंचालनासाठी कोणत्याही कौशल्याची गरज नाही” असं म्हणत तिला निर्मात्याने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दलही सांगितले आहे. त्याचबरोबर मिनीने आजकाल चालणाऱ्या रिॲलिटी शोच्या सूत्रसंचालनाच्या कौशल्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘हिंदुस्तान टाईम्स’शी संवाद साधताना तिने असं म्हटलं होतं की, “मी गरोदर असताना मला एका अशा कारणांमुळे शोमधून काढण्यात आले, जे ऐकून मला खूप वाईट वाटलं”.
गरोदरपणामुळे शोमधून काढून टाकण्यात आल्याबद्दलही मिनीने धक्कादायक खुलासा केला होता. यावेळी तिने असं म्हटलं होतं की, “मी गरोदर असताना एका मोठ्या शोच्या निर्मात्याने मला सांगितले की, भारतीय प्रेक्षकांना गर्भवती महिलांना टीव्हीवर पाहणे कधीही आवडत नाही. जे ऐकून मला खूपच वाईट वाटले आणि केवळ मी गरोदर असल्यामुळे मला या शोमधून काढून टाकण्यात आले होते”.
मिनीने ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या ३ सीझनचे सूत्रसंचालन केले होते आणि प्रेक्षकांनाही ती सूत्रसंचालक म्हणून आवडली होती. पण गरोदरपणामुळे तिला या शोमधून ब्रेक घ्यावा लागला. मग आई झाल्यानंतर मिनी पुन्हा सूत्रसंचालक म्हणून परतली आणि संगीतासंबंधित तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले.
दरम्यान, यावेळी मिनीने पूर्वीच्या आणि आताच्या रिॲलिटी शोचीही तुलना केली. याबद्दल तिने असं म्हटलं की, “आता एखाद्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासाठी तुम्हाला कोणत्याही कौशल्याची गरज नाही. जे टीव्हीवर लोकप्रिय आहेत आणि ज्यांचे सोशल मीडियावर भरपूर फॉलोअर्स आहेत. त्यांना टेलीप्रॉम्प्टरमध्ये शब्द टाका आणि मग सूत्रसंचालक तयार होतो”