काही दिवसांपूर्वी एका नोकरीच्या जाहिरातीत मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असं म्हटलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. लिंक्डिनवर एक जाहिरात करण्यात आली होती. त्यामध्ये मुंबईत ग्राफिक्स डिझाईनसाठी जागा असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, मराठी माणसाने अर्ज करु नये, असे म्हटल्याने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला होता. मुंबईसह राज्यात संबंधितांविरोधात संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यात आली.
अशातच या सगळ्या प्रकरणावर आता अभिनेत्री रेणुका शहाणेची पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) मराठी माणसांबरोबरच्या या दुजाभावावर संताप व्यक्त केला आहे. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना रेणुका शहाणे यांनी मराठी माणसांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल व त्यांच्याबरोबरच्या दुजाभावाबद्दल, त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना मतदान न करण्याचे आवाहन केले आहे.
मराठी "not welcome" म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका 🙏🏽
— Renuka Shahane (@renukash) May 7, 2024
मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका 🙏🏽
ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला…
रेणुका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “मराठी ‘Not Welcome’ म्हणणार्या लोकांना कृपया मत देऊ नका. मराठी लोकांना घरं न देणाऱ्या लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना कृपया आपलं बहुमूल्य मत देऊ नका. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी मराठी भाषा किंवा लोकांना कमी लेखलं जातं, अशा लोकांचे समर्थन करणाऱ्या उमेदवारांना किंवा पक्षाला कृपया मत देऊ नका.”
यापुढे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत असं म्हटलं आहे की, “मी कुठल्याही जाती, धर्म किंवा भाषेच्या विरुद्ध नाही, पण जे आपल्याच महाराष्ट्रात, आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत नाहीत, अशा लोकांना, शांतपणे, मत न देऊन, त्यांची चूक दाखवून दिलीच पाहिजे”.
दरम्यान, रेणुका यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी या पोस्टवर रेणुका यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. तुम्ही दाखवलेल्या या भूमिकेबद्दल तुमचे अभार म्हटलं आहे, तर काहींनी त्यांच्याया पोस्टला विरोध केला आहे. तुम्ही मराठीत किती चित्रपट केले आहेत असा प्रश्न विचारला आहे, तर काहींनी उगाच उमेदवार किंवा पक्ष मध्ये आणण्यापेक्षा त्या संबंधित कंपनीविरुद्ध तक्रार का नाही” असा सवाल केला आहे.