अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सिद्धार्थचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याने अभिनेत्री मिताली मयेकरसह लग्न गाठ बांधली. दोघेही नेहमीचं सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा मिताली सोशल मीडियावरील पोस्टमुळे ट्रोलही झाली आहे. यावेळी सिद्धार्थने नवरा म्हणून बायकोची बाजू घेत ट्रॉलर्सला सडेतोस उत्तरही दिलं आहे. (Siddharth Chandekar On Marriage)
सिद्धार्थ व मिताली यांचा लग्नानंतरचं आयुष्य सुरळीत सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ते नेहमीच सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबर वेळ घालवतानाचे अनेक फोटो पोस्ट करत असतात. सिद्धार्थचा लवकरच नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्नसंस्थेवर आधारित असलेला ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यावेळी इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत ‘लग्न टिकवण्याबाबत त्याचं मत काय आहे’ याबाबत त्याने भाष्य केलं.
लग्न टिकवण्याबाबत सिद्धार्थचं नेमकं काय मत आहे याबाबत बोलताना तो म्हणाला, “काम संपल्यानंतर मला माझ्या घरी निघून जायला फार आवडतं. शूट संपलंय, मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी केली हे सगळं संपवून पॅकअप केल्यानंतर मला माझ्या घरी, माझ्या माणसाकडे जायला फार आवडतं. कारण तेव्हा मला कोणताच मुखवटा घालायचा नसतो. मला तिला इंप्रेस करायला, तिला माझा अभिमान वाटावा म्हणून फक्त चांगलं काम करावं लागेल एवढीच मेहनत मला करायची आहे. आणि ती खूप सोप्पी आहे” असं तो म्हणाला.
यापुढे अभिनेता म्हणाला, “मला घरी जाऊन फक्त तिच्याबरोबर एकत्र राहायचं आहे. तू तुझं जग, मी माझं जगतो हे जिथे घडत तिथे वेगळं होण्याचा विषयही येत नाही. आपण आधी कोणतीही गोष्ट सहन करायचो पण आता ही सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे का? हा प्रश्न स्वतःलाच विचारावा लागणार. एखादी वस्तू बिघडली तर ती फेकून देण्याऐवजी दुरुस्त करता येईल का हे करून पाहावं” असं म्हणत त्याने लग्न तोडण्याकडे नव्हे तर टिकवण्याकडे त्याचा असलेला दृष्टिकोन मांडला आहे.