Sankarshan Karhade Emotional : अभिनेता, लेखक, सूत्रसंचालक या तीनही जबाबदाऱ्या पेलवत अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने रसिकांच्या मनात घर केलं. नाटक, मालिकांमधून संकर्षणने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही अपडेट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. नेहमीच तो त्याच्या डेली रुटीनमधील खास प्रसंग, विविध अनुभव चाहत्यांसह शेअर करतो. सध्या संकर्षण रंगभूमीकडे वळला आहे. त्याची अनेक नाटक रसिकांचं भरभरुन मनोरंजन करत आहेत. अशातच संकर्षणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर भावुक पोस्ट शेअर केली.
संकर्षणने लिहिलेल्या पहिल्या नाटकाचा शेवटचा प्रयोग झाला त्यानिमित्त अभिनेत्याने भावुक पोस्ट लिहिली. इतकंच नाहीतर संकर्षणने त्याच्या नाटकाचा शेवटचा प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याचंही सांगितलं. संकर्षणने पोस्ट शेअर करत म्हटलं, “नमस्कार. सुप्रभात. काल #तूम्हणशीलतसं नाटकाचा शेवटचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे पार पडला. प्रेक्षकांनी नाटकाला हाऊसफुल्ल निरोप दिला. त्या निमित्ताने काही लिहिलंय ते शेअर करतो. कसं वाटतंय सांगा”.
माझ्यातल्या लेखकाचं दोन हजार, चौदाला लगीन झालं
‘लेखणी’ नावाच्या बायकोपासून, मला हे पहिलं बाळ झालं…
म्हणलं नाव असं ठेऊ, की होणार नाही हसं
सर्वानुमते ठरलं मग, ‘तू म्हणशीलतसं’…
कलाकृतीचा बाप होऊन, या क्षेत्रांत थोडीच भागतं ???
निर्माता नाव्याच्या काकाकडे, त्याला दत्तक द्यावं लागतं…
चांगला काका शोधण्याचे, सगळे प्रयत्नं संपले
अचानक काका मिळाले हो… प्रशांत पुरषोत्तम दामले…
मग ‘प्रसाद’ नावाच्या मास्तराला, संस्कारांसाठी बोलवलं
सगळ्यांनी मिळून हे बाळ चांगलं, ४५० प्रयोग चालवलं…
पण आज मात्रं बापाचं काळीज, आतून खूप हाललंय
माझं पहिलं बाळ मला सोडून, लांब कुठेतरी चाललंय…
नाटकाला गच्चं पकडून ठेवाव, असं होत नसतं हो,
प्रत्येक जीवाप्रमाणे नाटकाचंही, ठरलेलं आयुष्यं असतं हो…
एक विनंती तुम्हाला करतो, जरा समजुन घ्याल का ?
या कलाकृतीतला तुमच्या, मनांत जिवंत ठेवाल का…?
आग्रह नाही हं मुळी, वाटलं तर ठेवा बरं
मोबदला म्हणून तुम्हाला देतो वचन खरं…
‘तथास्तु’ म्हणा ह्या वाक्याला, जे पुढे आता बोलीन
लेखणी सोबतच्या संसारात पुढेही , चांगली पोरं जन्माला घालीन…!!!
संकर्षणने ही पोस्ट शेअर करत प्रशांत दामले, प्रसाद ओक, कलाकार आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. सध्या संकर्षणच ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालतंय.





