nilesh sable reaction on sharad upadhye : प्रसिद्ध राशिचक्रकार शरद उपाध्ये आणि अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे यांच्यातील वाद कानावर आला. शरद यांनी निलेश विरोधात फेसबुक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी निलेशवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर निलेश यांनी शांत न राहता थेट व्हिडीओद्वारे आपली बाजू मांडत मुद्दा स्पष्ट केला. निलेश व शरद यांच्यातील या वादावर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या पाहायला मिळाल्या. हे प्रकरण काही दिवसांपासून शांत झाल्याचं पाहायला मिळत असतानाच आता निलेशने एका मुलाखतीत पुन्हा एकदा या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
निलेश साबळे यांनी नुकतीच ‘लोकशाही मराठी’ या चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी शरद उपाध्ये प्रकरणाविषयी भाष्य करताना ते म्हणाले की, “मी तो विषय आता विसरुन गेलो आहे, तुम्ही विचारलात म्हणून… कारण, एखादी गोष्ट तेव्हाच थांबते जेव्हा आपण त्याविषयीचं बोलणं थांबवतो. मी त्या व्हिडीओमध्ये नमूद केल्याप्रमाणे सन्माननीय शरद उपाध्ये सरांनी यापूर्वी सुद्धा दोन-तीनवेळा अशा पोस्ट केल्या होत्या. तेव्हा मी गोष्टी सोडून दिल्या होत्या. सहा वर्षांपूर्वी सुद्धा त्यांनी अशीच एक पोस्ट लिहिली होती. त्यातही त्यांनी बरंच काही म्हटलं होतं. शेवटी सांगायचं काय तर कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं. कलाकार व्यक्त झाले तरी समस्या निर्माण होते आणि एखादा कलाकार व्यक्त झाला नाही तरी समस्या निर्माण होतात”.
आणखी वाचा – Video : मुळशीमधील गावात शेतीत रमले प्रवीण तरडे, शेत बांधावर लावलं सफरचंदाचं झाड, व्हिडीओ व्हायरल
पुढे निलेश साबळे म्हणाले, “पूर्वी या गोष्टी व्हायच्या नाहीत. पण, आता काय झालंय. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे मला अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जरी लिहायचं असेल तरी मी पटकन लिहू शकतो. माझी पोस्ट जर त्यांच्यापर्यंत पोहोचली तर, दुसऱ्या मिनिटाला ते सुद्धा ती पोस्ट वाचू शकतात. आता सोशल मीडिया संवाद साधण्याचं नवीन माध्यम झालंय पण, त्यावर काहीही लिहिणं हे योग्य नाही. मला असं वाटतं की अलीकडच्या काळात हे फार सुरु झालं आहे. आपण एखाद्या गोष्टीवर काहीही बोलायच्या आधी प्रतिक्रिया यायला सुरु होतात”.
“त्या घटनेनंतर अनेकांना असं वाटलं, ‘अरे निलेश साबळेचा हा चेहरा आम्हाला माहितीच नव्हता’, ‘अरे बरं झालं तुम्ही निलेशचा खरा चेहरा आमच्यासमोर आणला, ‘निलेश साबळे असा असेल असं आम्हाला वाटलंच नव्हतं’, असा विचार अनेकांनी केला. कलाक्षेत्रात तुमची एक इमेज असते आणि ती जर अशा प्रसंगांमुळे डागाळली गेली तर, पुढच्या कामांवर त्याचा निश्चित परिणाम होतो. मला माझेच लोक विचारु लागले. तू असा वागला होतास का? मग मी ठरवले की, नाण्याची एक बाजू लोकांना समजली आता दुसरी बाजू कळणं फार गरजेचं आहे. एखादी मोठी व्यक्ती जेव्हा हे सगळं सांगते. तेव्हा लोकांना वाटतं अरे हेच बरोबर आहे. त्यामुळे यावेळी सविस्तर बाजू मांडणं मला महत्त्वाचं वाटलं”.
“सगळ्या गोष्टींचा विचार करुन आपण आपला मुद्दा प्रामाणिकपणे मांडला पाहिजे असा विचार मी केला. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा निश्चित अधिकार आहे पण, त्यांनी नीट माहिती घ्यायला हवी होती. गैरसमजातून झालेला तो सगळा प्रकार होता. मी सगळ्यांना एकच सांगेन आता तो विषय माझ्या बाजूने पूर्णपणे संपला आहे. शरद उपाध्ये सर आपल्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि मी त्यांचा आयुष्यभर आदरच करेन”, असं अखेरी निलेश म्हणाले.





