‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘मोरूची मावशी’ या नाटकांमधून अभिनेता भरत जाधवने स्वतःची अशी ओळख निर्माण केली. आज यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत भरत जाधव यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. मात्र भरत जाधव यांचा या अभिनय क्षेत्रातील प्रवास काही सोप्पा नव्हता. आजवर त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अगदी अभिनय क्षेत्रात कुणीही वारसा नसताना भरत यांनी त्यांची सिनेसृष्टीतील स्वतःची अशी जागा स्वतः निर्माण केली. भरत जाधव यांचा स्वतःचा असा खूप मोठा चाहतावर्ग आहे. विनोदी कलाकार म्हणून त्यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. (Bharat Jadhav Shared Incident)
कोणत्याही कलाकाराला दिग्गज कलाकारांची भेट ही अविस्मरणीय असते. भरत जाधव हे जेव्हा पहिल्यांदा सायरा बानू यांना भेटले होते त्यावेळी त्यांच्याबरोबर घडलेला एक किस्सा त्यांनी ‘एबीपी माझा’च्या ‘माझा कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. अगदी पहिल्या भेटीत भरत जाधव यांनी थेट सायरा बानू यांची मस्करीचं केली होती. हा वयाने लहान असल्याने आणि त्यावेळी सिनेसृष्टीबरोबर काहीही संबंध नसताना झालेली ही भेट असल्याने भरत पटकन काय म्हणून गेले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही.
हा किस्सा सांगत भरत जाधव म्हणाले, “आम्ही लहान असताना एकदा सायरा बानू यांची मस्करी केली होती. आम्हाला शाळेत दोन रुपयाचं तिकीट दिलं जायचं. २०, २० पैशांची अशी ती तिकीट असायची. आणि सांगितलं जायचं की तिकीट बाहेर विकून तुम्ही पैसे घेऊन या. आमच्या घरी तर कोणीच विकत घेणार नव्हतं. त्यादरम्यान घराजवळच एक शूटिंग चालू होतं आणि तिथे सायरा बानू बसल्या आहेत असं मला कळलं. मी ते तिकीट घेऊन त्यांच्याजवळ गेलो. तेव्हा मी ते तिकीट त्यांच्यापुढे केलं आणि त्या म्हणाल्या, ‘बेटा आता माझ्याकडे पैसे नाहीत’.”
“हे ऐकल्यावर त्या गर्दीत मी पटकन म्हणालो, “दोन रुपये नाहीत हिच्याकडे आणि कसली नटी”. लहान असल्याने बुद्धी नव्हती तेवढी की आपण नेमकं काय बोलून गेलो, आम्हाला इतकंच कळायचं की, तिकीट विकलं गेलं नाही तर शाळेत काय सांगायचं. एवढ्या मोठ्या नटीकडे पैसे आहेत पण शूटिंग सुरु आहे म्हणून तिच्याजवळ त्यावेळेला पैसे नाहीत, याचा मी विचारचं नाही केला.”