Aastad Kale : मराठी मालिका, नाटक, चित्रपट यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत अभिनेता आस्ताद काळेने चाहत्यांमध्ये छाप पाडली. दमदार अभिनयामुळे व बेधडक वक्तव्यामुळे कायमच आस्ताद प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. आस्ताद अभिनय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकीय घडामोडींबाबतही भाष्य करत असतो. इतकंच नाही तर आस्ताद त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत असतो. आस्ताद बरेचदा त्याच्या आयुष्यात आलेल्या कठीण काळाबाबत बोलताना दिसतो. आस्ताद ज्या अभिनेत्रीसह रिलेशनमध्ये होता तिच्या निधनानंतर तो बराच खचला होता. आस्तादच्या तोंडून बरेचदा त्याच्या या नात्याबद्दल ऐकलं आहे. अभिनेत्री प्राची मते हिच्याबरोबर तो रिलेशनशिपमध्ये होता. मात्र बोनमॅरो कॅन्सर या आजाराने प्राचीची प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टीत स्थिरावणाऱ्या प्राचीचा आजार अंतिम टप्प्यात असल्याचे निदान झाले, आणि उपचारांती तिचं निधन झालं.
आस्तादने ‘कॉकटेल स्टुडिओ’ या युट्युब चॅनेलला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो प्राचीच्या आठवणींबद्दल बोलताना दिसला. यावेळी बोलताना तो भावुकही झाला. आस्ताद म्हणाला, “प्राची. महाराष्ट्र कल्चरलच्या ग्रिप्सच्या ग्रुपमध्ये काम करायची. तिच्याबद्दल मी बाबाकडून वर्णन ऐकलं होतं. बाबाने बसवलेलं एक नाटक मी बघायला गेलो तेव्हा मी प्राचीला भेटलो. मी तिच्याकडे जाऊन जेवायला कधी जाऊया असं सरळ विचारलं, आणि त्यानुसार आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जेवायला गेलो. त्यानंतर बोलणं, भेटणं सुरु होतं. प्राचीला ‘चार दिवस सासूचे’ ही मालिका मिळाली त्याआधी ती मुंबईला शिफ्ट होण्याबद्दल बोलली. तेव्हा मीच तिला म्हणालो की, आपण एकत्र राहिलो तर चालेल का?, यावर तिचाही होकार आला. त्यानंतर जवळपास साडेतीन चार वर्ष आम्ही एकत्र होतो”.
पुढे तो म्हणाला, “तिला जो आजार झाला होता तो दहा लाखांत एक किंवा दोन लोकांना होतो. आणि तो आजार मुळातच तिसऱ्या स्टेजला कळतो. त्यामुळे कळेकळेपर्यंत हातची वेळ निघून गेली होती. २४ की २५ डिसेंबरला तिला ऍडमिट केलं आणि १९ फेब्रुवारीला ती गेली. मी देव मानत नाही पण एक शक्ती आहे जी हे सर्व चालवते असं माझं मत आहे. १९ फेब्रुवारीला माझा लग्नाची बेडी या नाटकाचा मुंबईत प्रयोग होता. मी १८ तारीखला तिला भेटून निघालो तेव्हा तिची अवस्था प्रचंड वाईट होती. प्रयोग संपवून आम्ही पुण्याला जायला निघालो. जाताना मध्ये खाऊन येतो असं म्हटलं आणि मी घरी फोन केला. पोहोचल्यावर तिथे सगळे ओळखीचे लोक तिथे जमले होते. गाडीतून खाली उतरताच पटकन चल, बराच वेळ झाला आहे आता ठेवणार नाही असं कानावर आलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आणि मी बाबाला थांबवून विचारलं बाबा गेली का?, तेव्हा तो हो असं म्हणाला. हे तिचं आजारपण डिसेंबरपासून सुरु झालं. अस्थी विसर्जनासाठी मी जेव्हा जात होतो, माझा एक मित्र गाडी चालवत होता आणि प्राचीचा फोन माझ्याकडे होता. तेव्हा तिच्या फोनवर एक फोन आला की, तुमचं कास्टिंग झालं आहे. पण तेव्हा मी हे आता शक्य नाही, अशी परिस्थिती आहे असं सांगितलं. वय वर्ष २३. २३ हे अशा पद्धतीने जायचं वय नाही. त्यावेळी माझी मम्मा खूप आवेगाने म्हणाली होती, दारू, सिगारेट, रात्रीची जागरण करतात त्यांना काही होतं नाही आणि हिच्या वाटेला हे आलं.
आस्तादच्या आयुष्यातून आणि हे जग सोडून प्राची गेल्यानंतर त्याची अवस्था कशी होती याबाबत बोलताना तो म्हणाला, “प्राची गेल्यानंतर मी अल्कोहोलिक झालो. जवळजवळ दीड वर्ष मी कामाच्या बाबतीत इतका बेशिस्त वागलो की इंडस्ट्रीतून माझी हाकलून द्यायची लायकी झाली होती. ज्या घरात मी आणि प्राची राहत होतो, त्याच घरात मी ती गेल्यानंतरही राहत होतो. दिवस कामात निघून जायचा पण कुलूप उघडून आत गेलो की, घर आणि प्रत्येक वस्तू मला खायला उठायची. प्राचीच्या बाबतीत आपण या वेळेला कसे चुकीचे वागलो. हे पुढचे दोन-तीन महिने मला आठवू लागलं. त्या काळात मी खूप बेशिस्त वागलो. ‘पुढचं पाऊल’ ही मालिका मी करत होतो, त्या युनिट मधील प्रत्येकाने मला समजून घेतलं, सांभाळून घेतलं. या गोष्टीला जवळपास १२ वर्ष झाली आहेत. त्या चुकांचे पडसाद आज आम्हा कोणाच्याही नात्यात उमटत नाहीत”.