Mumbai road condition : मराठमोळा अभिनेता आस्ताद काळे सध्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत केलेल्या भाष्यामुळे चर्चेत आला आहे. कालपासून आस्ताद चर्चेत आहे. रस्त्यांची दुरावस्था दाखवत त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. यानंतर आता आस्तादने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. बिनधास्त, बेधडक वक्तव्य करण्यात आस्ताद नेहमीच पुढे असतो. समाजात घडणाऱ्या वाईट घटनांवर तो नेहमीच आवाज उठवतो. अशातच अभिनेत्याने आता पुन्हा एकदा रस्त्यांच्या वाईट अवस्थेवरून सरकारला टोला लगावला आहे. ठाण्याहून मुंबईकडे परतताना आस्तादने मुंबईतील रस्त्यांची खरी अवस्था दाखवून दिली आहे. आणि नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना थेट सवाल केला आहे.
आस्तादने या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “नमस्कार! याआधी मी घोडबंदर रोडवरील रमणीय खड्ड्यांबाबत एक व्हिडीओ शेअर केला होता. आता इथून मुंबईत शिरतानाची काही अप्रतिम दृश्ये दाखवतो”, असं म्हणत त्याने इंस्टाग्रामवर रस्त्यांच्या दुरवस्थेचा व्हिडीओ शेअर केला आहे. पुढे त्याने म्हटलं आहे की, “नितीन गडकरी काका, देवेंद्र काका, एकनाथराव काका… मी तुम्हाला साहेब म्हणू शकत नाही, कारण एकतर तुम्ही जनतेचे सेवक आहात. लोकांनी तुम्हाला राज्य चालवण्यासाठी आणि जनतेच्या सोईसुविधांकडे लक्ष देण्यासाठी निवडून दिले आहे, त्यामुळे वयाचा मान राखत मी तुम्हाला काका म्हणत आहे. तर आता आपण मीरा-भाईंदर परिसरात शिस्त आहोत. इथे उजवीकडे एखाद्या किल्ल्याची भिंत वाटावी असं बांधकाम केले आहे; तो खरंतर एक फ्लायओव्हर बांधला जात आहे. पण याचं काम गेले अडीच महिने बंद आहे, हे मी स्वतः बघत आहे. अर्धवट काम करुन ते बंद केलं आहे”.
पुढे त्याने असं म्हटलं आहे की, “मीरा-भाईंदर परिसरातील ब्रिजची काही दृश्ये दाखवत तो पुढे म्हणतोय, “आता पुढे खरी जादू सुरु होते, ती बृहन्मुंबई महानगरपालिकेची. जिथे मीरा-भाईंदर ब्रिज संपतो, तिथून एक रस्ता जातो तो काशिमीरा ब्रिजजवळ. इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. खड्ड्यांच्या आसपास तो पुतळा आहे. महाराज हतबल होऊन त्यांच्याच महाराष्ट्राल्या राज्यकर्त्यांचा कारभार पाहत आहेत. काशिमीराच्या ब्रिजवर खड्डे तर आहेतच; पण या ब्रिजवरील एकही लाईट सुरु नाही. म्हणजे आपल्या आयुष्यातला थरार पदोपदी आणि पावलोपावली किती वाढवायचा याची काळजी हे प्रशासन घेत आहे”.
आणखी वाचा – कॅमेरा बंद असताना फराह खान कशी वागते?, कुक दिलीपनेच केला खुलासा, म्हणाला, “खूप वाईट…”
अभिनेता पुढे म्हणतोय, “मी मुंबई महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो, तुमच्यामुळे आम्हाला आमच्या आयुष्याची किंमत रोज कळते. आम्ही स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून कमावलेल्या गाडीची, त्यात तुम्हालाही भरघोस टॅक्स दिल्याची किंमत आम्हाला पदोपदी कळते. या ब्रिजवरचा एकही लाईट सुरु नाही. पण, ब्रिज संपल्यानंतर मात्र लखलखाट दिसू लागतो”. शेवटी अभिनेता म्हणतो, “नितीन गडकरी काका, देवेंद्र फडणवीस काका, एकनाथ शिंदे काका, अजित पवार काका आणि महाराष्ट्र विधानसभेत बसलेल्या सर्वच २८८ काका-काकू, मामा-मावश्यांचे मी आभार मानतो, इतक्या सोयी-सुविधा तुम्ही दिल्या आहेत. त्यात गाडी चालवताना रेल्वेने प्रवास केल्याचा अनुभव मिळतो, कारण ब्रिजवरील प्रत्येक जॉईंट्सवर तुम्हाला एक हादरा बसतो; तर महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, भारत सरकार या सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद”.





