छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे अनेक प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतात. आजही असा एक प्रेक्षक वर्ग आहे जो रोज नित्यनियमाने मालिका बघतो आणि त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. तसेच मालिकेतील कथानक किंवा पात्रांबरोबर स्वत:चा संबंध जोडतो. असाच स्वत:चा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केलेली मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते?’. गेल्या साडेचार वर्षात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मालिकेत आजवर अनेक बदल झाले. अनेक मोठे ट्विस्ट आले. यावेळी प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रियाही दिल्या.
अशातच मालिकेत नुकतेच आशुतोषचे निधन झाल्याचा ट्विस्ट पाहायला मिळत आहे आणि याचा एक प्रोमोदेखील सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मात्र, मालिकेत आलेले हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना आवडलेले नाही. ‘आई कुठे काय करते’च्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. यावर मालिकेतील कलाकारांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. अशातच या साऱ्यावर आता स्वत: अरुंधतीने तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘आई कुठे काय करते’मधील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरने प्रेक्षकांच्या नाराजीबद्दल असं म्हटलं आहे की, “प्रेक्षकांनी नाराज होणे स्वाभाविकच आहे. कारण आशुतोष हे पात्र लोकांना खूप आवडत होतं. मालिकेतील अरुंधती व आशुतोषची केमिस्ट्रीही त्यांना आवडत होती आणि आता तो या मालिकेत नसणार आहे. हा धक्का कुणालाच पचवता आलेला नाही. त्यामुळे नकारात्मक प्रतिक्रिया येणे हे अगदीच स्वाभाविक आहे. कारण इतकी नकारात्मकता कुणालाच सहन होत नाही.”
यापुढे मधुराणी यांनी असं म्हटलं की, “मालिकेत हा नवीन टर्न (वळण) आहे. त्यामुळे एखादी रेल्वे रुळावरुन जात असताना खडखडाट हा होतोच. तसेच हे नवीन वळण आपल्याला पेलणार आहे का? आणि हे आपल्याला बघवणार आहे का? हे प्रेक्षकांनाही आता काही कळत नाहीय. त्यामुळे प्रेक्षक दु:खी आहेत. पण ठीक आहे. अरुंधती यातूनही नवीन मार्ग काढेलच”.
दरम्यान, मालिकेतील आशुतोषच्या अचानक जाण्याने अरुंधतीच्या आयुष्यात आता काय नवीन बदल होणार? ती यातून कशी बाहेर येणार? यासाठी प्रेक्षकांनीही तिला धीर दिला पाहिजे. कुटुंबाप्रमाणेच प्रेक्षकांनीसुद्धा अरुंधतीच्या मागे खंबीर उभे राहण्याचे आवाहन मधुराणी यांनी केले आहे.