स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘आई कुठे काय करते?’. मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आणि ही लोकप्रियता अजूनही कायम आहे. मात्र आधी टीआरपीच्या शर्यतीत सतत अव्वल असणारी ही मालिका गेल्या काही दिवसांपासून टॉप ५च्या शर्यतीतूनदेखील बाहेर पडली होती. अशातच सततचा मालिकेतील टीआरपीमध्ये सतत उतार झाल्यानंतर आता मालिकेच्या कथानकाने एक अनपेक्षित वळण घेतले. मालिकेत मोठा ट्विस्ट दाखवण्यासाठी आता आशुतोषचे निधन झाल्याचे दाखवण्यात आले आहे.
मात्र, मालिकेत आलेले हे धक्कादायक वळण प्रेक्षकांना आवडलेले नाही. ‘आई कुठे काय करते’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे ही मालिका सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. यावर आता मालिकेतील कलाकार आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच मालिकेतील संजना व अनिरुद्ध म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले व अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी मिलिंद यांनी असं म्हटलं की, “प्रेक्षकांनी विरोध करावा. विरोध करत आहेत म्हणजे प्रेक्षक ती मालिका बघत आहेत, मालिका बघितल्या शिवाय ते प्रतिक्रिया देणार नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, नातेवाईकांत किंवा अगदी घरातसुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी खटकत असतात. सगळंच पटतं असं नाही. ‘आई कुठे काय करते’ मालिकासुद्धा असेच एक कुटुंब आहे. त्यामुळे या मालिकेची प्रेक्षकांशी नाळ जोडली आहे.”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “प्रेक्षकांनी विरोध केला, तरी काही हरकत नाही. त्यामुळे आम्हालादेखील आम्ही नेमके कुठे चुकत आहोत हे कळतं. कारण सगळेच सगळं बरोबर करतात असं नसतं. मालिकेला साडेचार वर्ष झाले असून या वर्षात आम्ही अनेकदा चुका केल्या आहेत. पण प्रत्येकवेळी आम्हाला आलेल्या प्रतिक्रिया आम्ही सकारात्मक पद्धतीने घेऊन त्यावर काम करत असतो.”
आणखी वाचा – “मी त्यांच्यासारखी नाही”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा जया बच्चन यांना टोमणा, म्हणाल्या “मी त्यांच्यापेक्षा खूप…”
दरम्यान, आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या वेळेत बदल झाला असून ही मालिका आता दुपारच्या सत्रात दाखवली जाणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने मिलिंद गवळी व रुपाली भोसले यांनी प्रेक्षकांना मालिका पाहण्याचे आवाहनदेखील केले आहे.