मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणून अभिनेता हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांना ओळखले जाते. हेमंत व क्षिती यांनी २०१२ मध्ये एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. मनोरंजन सृष्टीत काम करता करता ही जोडी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी एकमेकांबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या लग्नाला जवळपास १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या दोघांचे लग्न एक वर्षही टिकणार नसल्याचे मत अनेकांनी तेव्हा व्यक्त केले होते. स्वत: क्षितीने याबद्दलचा खुलासा केला आहे.
क्षिती जोगने नुकतीच आरपार या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने “आमचं लग्न एक वर्षही टिकणार नसल्याचे अनेकांना वाटले होते” असं म्हटले. याबद्दल बोलताना तिने असं म्हटलं की, “माझी आई मला असं म्हणाली होती की, तूमच्या लग्नाला एक वर्ष झालं तरी देव पावला म्हणायचं. कारण आम्ही दोघेही खूप भिन्न आहोत. आम्ही स्वभावानेही एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत. माझे आधीचे बॉयफ्रेंड्स (प्रियकर) किंवा जे रिलेशन्स होते, त्यापैकी हेमंत माणूस म्हणून एकाहीसारखा नाही.”
यापुढे तिने असं म्हटलं की, “तेव्हा मी आमचा एक मित्र समीर विद्वांसला मी फोन करुन याबद्दल सांगितले होते. तेव्हा त्याने मला हे करु नको असं सांगितलं होतं. माझी मैत्रीण मुग्धा कर्णिक हिलादेखील मी याबद्दल सांगितलं, तेव्हा तिने “तुला याबद्दल खात्री आहे का?” असं म्हटलं होतं. पण तेव्हा मी तिला “मला इतके दिवस खात्री असूनही काही झालं नाही तर आता खात्री नसताना काय होतं ते करुन बघू” असा विचार केला”.
यापुढे क्षिती हेमंतबरोबरच्या नात्याबद्दल असं म्हणाली की, “खरंतर आमची लव्हस्टोरी ही लग्नानंतर खऱ्या अर्थाने सुरु झाली. मी त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे आणि तेव्हा मला वेळ वाया घालवायचा नव्हता. त्यामुळे आम्ही फार वेळ न घेता लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या १ वर्षात आम्ही खूप भांडलो. पण आम्ही दोघे कायमच टीम म्हणून एकत्र राहिलो. त्यामुळे लग्नानंतर आम्ही चांगले मित्र झालो. लग्नानंतर आम्ही एकमेकांना खऱ्या अर्थाने ओळखायला लागलो”.