दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर हे आज हयात नसले तरी त्यांच्याविषयीच्या कोणत्याही गोष्टीने प्रत्येकांना त्यांची आठवण येतेच. ते आता आपल्यात नसले तरी अनेकांच्या हृदयात आजही त्याचे विशेष स्थान आहे. ऋषी कपूर यांचे कर्करोगाने निधन झाले असल्याचे आपण जाणतोच. तसेच त्यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल आणि उपचारांबद्दल बरेच वाचले गेले असले तरी, आता त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आणि जावई भरत साहनी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या कठीण काळाबद्दल सांगितले आहे.
गलाता प्लसशी संवाद साधताना, रिद्धिमाने तिच्या वडिलांविषयीची भावनिक गोष्ट व्यक्त केली आहे. रिद्धिमा साहनी आपल्या ऋषी कपूर यांच्याविषयी व्यक्त झाली. जेव्हा तिचे वडील वारले तेव्हा ती दिल्लीत होती आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याबरोबर नव्हती. तसेच लॉकडाऊनमुळे त्यांना प्रवासासाठीही विशेष परवानगी घ्यावी लागली. मात्र तरीही ती त्यांच्या अंत्यसंस्कारानंतरच आली. यावेळी तिने आपल्याला प्रत्यक्ष न भेटता आल्यामुळे व्हिडीओ कॉलद्वारे त्यांना बघितल्याची आठवणही व्यक्त केली.
आणखी वाचा – किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…
ही आठवण सांगताना तिने असं म्हटलं की, “वडिलांनी मला त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी फोन केला होता. पण मी त्यांचा फोन उचलू शकली नाही. पप्पांनी मला कॉल केला होता, तो अजूनही माझ्या फोनमध्ये आहे. तो त्यांचा शेवटचा कॉल होता. कदाचित मी तेव्हा तो कॉल उचलला असता तर बरं झालं असतं असं मला आजही वाटतं. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही किंवा त्यांच्याशी बोलताही आले नाही. त्यांचा तो मिस कॉल मी अजूनही माझ्याकडे जपून ठेवला आहे. मी त्यांच्या मिस कॉलचा स्क्रीनशॉट घेतला आणि सेव्ह केला. कारण त्यांनी मला कॉल केलेली ही शेवटची एक आठवण होती.”
दरम्यान, ऋषी कपूर यांना त्यांच्या शेवटच्या दिवसांत कॅमेऱ्यासमोर उभे राहून चित्रपटांत काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांच्या जावयाने सांगितलं. ऋषी कपूर यांचे निधन 30 एप्रिल रोजी झाले. त्यावेळी कोरोनामुळे लॉकडाऊन झाला होता. रिद्धिमा तिच्या वडिलांच्या अंत्यविधीला पोहोचू शकत नव्हती. आलिया भट्टनं तिला व्हिडीओ कॉलवर ऋषी कपूर यांचे शेवटचे दर्शन दिले.