टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘कॉफी विथ करण ८’ सध्या खूपच चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे २ भाग प्रदर्शित झाले आहेत. पहिल्या भागात अभिनेत्री दीपिका पदुकोण पती रणवीर सिंहबरोबर आली होती. दुसऱ्या भागात बॉबी देओल व सनी देओल आले होते. तर या कार्यक्रमाच्या आगामी भागात अभिनेत्री सारा अली खान व अनन्या पांडे येणार आहेत. या भागातून करण जोहर त्याच्या भूतकाळातील काही वैयक्तिक घटना प्रेक्षकांसमोर आणणार असल्याचे म्हटले जात आहे. या भागात करण त्याच्या जिवलग मैत्रिणी काजोल देवगण आणि करीना कपूर यांच्यात झालेल्या वादाविषयी सांगणार आहे. (Karan Johar Talks About Kajol Devgan And Kareena Kapoor)
या भागात करणने असे म्हटले आहे की, “२००३ मध्ये तो करीना कपूरशी जवळपास दीड वर्ष बोलला नाही. कारण होते चित्रपट “कल हो ना हो”. करणच्या वडिलांना कॅन्सर झाल्यानंतर त्याचे निदान होईपर्यंत दोघेही बोलत नव्हते. याबद्दल करीनाला कळताच तिने करणला फोन करून “मला काय बोलावे हे कळत नाही” असे म्हटले होते. यावर करणने उत्तर दिले की, “काही बोलू नकोस, मला माहीत आहे तू माझ्याबरोब आहेस”. त्यानंतर काही दिवसांनी करणच्या वडिलांचे निधन झाले, तेव्हा करीना बँकॉकमध्ये होती. तोपर्यंत आमच्यातला वाद तसाच होता. शूटिंगवरून परतल्यानंतर ती थेट घरी आली. त्या रात्री आम्ही एकमेकांशी बोलून आमच्यातील वाद मिटवला”.
यानंतर त्याने काजोलबरोबर झालेल्या भांडणविषयीदेखील सांगितले. या भांडणानंतर करण व काजोलमधील भावनिक संबंध कमकुवत झाल्याचे म्हटले. भांडणानंतर त्यांना असे वाटले की, त्यांच्यात पुन्हा आधीसारखी मैत्री होणार नाही. परंतु असे काही झाले नाही.
करणला मुलं झाल्यानंतर काजोलबरोबर झालेला वाद मिटवण्यासाठी त्याने यश व रूहीचे फोटो काजोलला पाठवले आणि त्याचबरोबर एक मॅसेजदेखील केला. यात त्याने असे म्हटले होते की, “माझ्या या मॅसेजवर तुला उत्तर देण्याची गरज नाही. पण माझी मुलं अशी दिसतात हे सांगण्यासाठी मी तुला मॅसेज केला आहे”. यावर काजोलने उत्तर देत असे म्हटले की, “मला आत्ता यांच्याविषयी खूप प्रेम वाटत आहे”. पुढे एक महिन्यानंतर करणशी काजोल बोलली. ती म्हणाली, “माझा वाढदिवस आहे पण तुला यायची गरज नाही”. पण तरीही मी काजोलच्या वाढदिवसाला गेलो आणि तिला मिठी मारली आणि आमच्यातलं भांडण मिटले”.
आणखी वाचा – “या नात्यात…”, कार्तिक आर्यनबरोबर ब्रेकअपबद्दल सारा अली खानचा मोठा खुलासा, म्हणाली, “तुम्ही या इंडस्ट्रीत…”
दरम्यान, करणच्या या शोमध्ये नेहमीच नवीन ट्विस्ट्स पाहायला मिळतात. मात्र त्याच्या येणाऱ्या भागात त्याने त्याच्या भूतकाळातील काही घटनांना पुन्हा नव्याने उजाळा दिला आणि यामुळे तो भावुक झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. त्यामुळे ‘कॉफी विथ करण’च्या या आगामी भागासाठी प्रेक्षकदेखील तितकेच उत्सुक आहेत.