झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या शोने गेली दहा वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘चला हवा येऊ द्या’ या शोमुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. यांमध्ये भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. याच शोमध्ये काही दिवसांनी नव्याने सहभागी झालेला अभिनेता व लेखक म्हणजे योगेश शिरसाट. योगेशने आजवर या कार्यक्रमामध्ये विविध भूमिका साकारल्या. त्याचबरोबर रुपेरी पडद्यावरही त्याने साकारलेल्या भूमिकांचं कौतुक झालं.
अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता त्याच्या लेखनशैलीने प्रेक्षकांना विचार करायला भाग पडायला लावतो. योगेश त्याच्या लिखाणाने आजवर अनेक सामाजिक व राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. अशातच योगेशने नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हा त्यांना सध्या सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर्सना अधिक महत्त्व दिले जाते. याविषयी त्यांचं मत विचारण्यात आलं.
याचं उत्तर देत योगेश शिरसाट यांनी असं म्हटलं की, “सगळेच रील स्टार्स असे नाही आहेत. काही रील स्टार्स छोट्या पडद्यावर येऊनही चांगलं काम करतात. पण प्रत्येक जण आपपला फायदा बघत असतो. कोणत्याही चॅनलला वाटतं की या रील स्टारला घेऊन आपण एखादी मालिका केली तर त्यांना असं वाटतं की त्या रीलस्टार्सचे फॉलोअर्स आपल्या टीआरपीकडे वळतील असं त्यांना वाटत असतं. पण असं काही नसतं.”
आणखी वाचा – “फॉलोअर्स पाहून काम गेलं अन्…”, योगेश शिरसाट यांचा मोठा खुलासा, म्हणाले, “चित्रीकरणाच्या दोन दिवसांपूर्वी…”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “आजकाल बरेच राजकीय पुढारी रीलस्टार्सचे पुरस्कार सोहळे ठेवायला लागले आहेत. त्यांना असं वाटतं की, त्या रीलस्टार्सचे फॉलोअर्स आपले फॉलोअर्स होतील. मग ते आपल्या मतपेटीत परावर्तित होतील. त्यांचा हा चांगला उद्देश आहे, तसं झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण हे असं काही होईल असं मला तरी वाटत नाही.”
दरम्यान, योगेश शिरसाट यांनी ‘मज्जाचा अड्डा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात त्यांनी मनमुरादपणे संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्राबद्दलही भाष्य केले. त्याचबरोबर अभिनय व लेखन क्षेत्राविषयीचे अनुभवही व्यक्त केले.