Sagar Karande Actor : सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आजवर स्त्री व्यक्तिरेखा साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे. पुरुषांनी साकारलेल्या या स्त्री व्यक्तिरेखा आजही अनेकांना ज्ञात आहेत. चित्रपट, मालिका, विनोदी शोमध्ये साकारलेल्या या कलाकारांची स्त्रीपात्र साऱ्यांना वेडं करणारी आहेत. आजवर सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे, सुबोध भावे, वैभव मांगले, विजू खोटे या कलाकारांनी स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या या भूमिकांचं नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळालं आहे. याशिवाय चला हवा येऊ द्या या मालिकेत भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे या कलाकारांनीही स्त्रीपात्र साकारली.
पण पुरुषाने स्त्रीपात्र साकारताना स्त्रियांच्या कोणत्याही भावना दुखावल्या नाही पाहिजेत म्हणून योग्य ती काळजी घ्यायला हवी. आणि याच विषयावर अभिनेता सागर कारंडेने सविस्तर भाष्य केलं आहे. सागर कारंडेने आजवर त्याच्या विनोदी अंदाजाने रसिकांच्या मनात घर केलं आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सागर कारंडेने स्त्रीपात्राबाबत भाष्य केलं आहे. यावेळी अभिनेत्याने स्त्री व्यक्तिरेखा साकारताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याबाबत सांगितलं आहे.
आणखी वाचा – आदित्य-पारूपाठोपाठ प्रिया-प्रीतमही घराबाहेर, अहिल्यादेवी मोठा निर्णय घेणार का?, ‘पारू’ मालिकेत मोठा ट्विस्ट
सागर कारंडेने म्हटलं की, “पुरुष कलाकारानं स्त्री व्यक्तिरेखा साकारताना कोणत्याही प्रकारे त्यांचा अपमान होणार नाही, हे डोक्यात आणि मनात फिट बसवलं पाहिजे. कसंही नाचणं, उड्या मारणं, वाकडेतिकडे हातवारे करणं, विचित्र हावभाव करणं म्हणजे स्त्री व्यक्तिरेखा साकारणं असं नसतं. ती व्यक्तिरेखा साकारताना त्या कलाकाराला भारी वाटलं पाहिजे, साडी सांभाळणं हे माझ्यासमोर मोठं आव्हान होतं, साडी नेसल्यावर नीटनेटकं वावरणं आवश्यक असतं”.
आणखी वाचा – Zubeen Garg Funeral : झुबीन गर्गला शेवटचं पाहायला चाहत्यांची तुडुंब गर्दी, डोळ्यांत पाणी आणणारा व्हिडीओ समोर
पुढे तो म्हणाला, “कुठे पदर सरकला आहे, पोट दिसतंय, हे होता कामा नये. दुसऱ्या बाईली ती व्यक्तिरेखा पाहताना छान वाटलं पाहिजे, हे माझं ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासाठी ध्येय असायचं. वावरण्यात महिलांप्रमाणे सहजता यावी म्हणून मी आई आणि पत्नीचं निरीक्षण करायचो, कारण मी साकारलेली स्त्री माझी मुलगी पाहणार होती. तिच्यापर्यंत ते सन्मानपूर्वकच पोहोचलं पाहिजे, असा माझा विचार होता”.





