Nilesh Sable controversy : डॉ. निलेश साबळे आणि राशिचक्रकार शरद उपाध्ये यांच्यातील वाद आता पेटून उठला आहे. शरद उपाध्ये यांनी दोन दिवसांपूर्वी निलेश यांचं थेट नाव घेत त्यांच्या वागणुकीवर, स्वभावावर भाष्य करणारी खरमरीत पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनंतर निलेश साबळे काय उत्तर देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. अखेर काल निलेश यांनी शरद यांचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत त्यांना उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी उत्तरं देण्यामागचं कारण सांगत म्हटलं की, ही पहिली वेळ असती तर सोडून दिलं असतं मात्र सहा वर्षांपूर्वीही तुम्ही मला पोस्टद्वारे टोकलं आणि मी वडीलधारी व्यक्ती म्हणून दुर्लक्ष केलं. अखेर शरद आणि निलेश यांचा सहा वर्षांपूर्वीचा हा मुद्दा आता पुन्हा चर्चेत आला आहे.
शरद उपाध्ये यांनी सहा वर्षांपूर्वी पोस्ट शेअर करत टीका केल्याचं निलेश यांनी व्हिडीओद्वारे म्हटलं. यावेळी काहीही कारण नसताना त्यांनी भंगारवाला असा त्याचा उल्लेख केला. निलेश साबळेंविरोधात शरद उपाध्ये यांनी सहा वर्षांपूर्वी केलेली ती पोस्ट काय आहे ते पाहुयात…
आणखी वाचा – “स्माईल दिली नाही?”, शरद उपाध्येंच ते वाक्य निलेश साबळेंनी खोडून काढलं अन्…; म्हणाले, “माझ्याकडे साक्षीदार…”

या पोस्टमध्ये शरद यांनी म्हटलं, “भालचंद्र कदम, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे हे करोडोंच्या किंमतीचे कोहिनूर हिरे आहेत. पण, त्यांची पारख अस्सल रत्नपारख्यालाच होईल ना. जेव्हा असे हिरे भंगारवाल्याच्या दृष्टीस पडतात, तेव्हा त्याला ती काच वाटते आणि तो एखाद्या फुटाणेवाल्याला ती देऊन एक रुपयाचे फुटाणे विकत घेऊन खातो. खरा हिरा हा मौल्यवान पेटीत मखमलीच्या गादीवर ठेवायचा असतो पण भंगारवाला त्याला घाणेरड्या कागदाच्या पुडीत पुरचुंडी करतो आणि कचऱ्याच्या भावात विकतो”.
आणखी वाचा – “पाणी विचारलं नाही ही माझी जबाबदारी?”, निलेश साबळेंचा शरद उपाध्येंना थेट सवाल, म्हणाले, “डोक्यात हवा…”
“रत्नांचा परीक्षक जव्हेरीच त्यांची अस्सल किंमत जाणतो. दुर्दैवाने हे मौल्यवान हिरे कधी साडीत, कधी लुंगीत, कधी अर्ध्या चXX गुंडाळतात. फक्त फुटाणे मिळावेत म्हणून कधीतरी त्यांना खूप आदर्श व्यक्तिमत्वाच्या भूमिकेत, चारित्र्यसंपन्न संतांच्या भूमिकेत, श्रेयाला एखाद्या तेजस्वी महाराणीच्या भूमिकेत सादर केले तर कसला कसदार अभिनय करतील हे हिरे! पण सतत वेडीवाकडी तोंडे, गलिच्छ मेकअप, अत्यंत हीन दर्जाचे पाचकळ विनोद, साड्या. आपल्याच वाहिनीवरच्या मालिकांचे विडंबन, आरडाओरडा, भाडोत्री प्रेक्षकांचे अशोभनीय अंगविक्षेप आणि हसणे, सुमार संदर्भहीन लेखन हे सारे पाहून विषण्ण वाटते. किती प्रतिभावान कलावंत खालच्या दर्जाला नेले जातात! सुसंस्कृतपणापेक्षा टीआरपी महत्वाचा ठरतोय खरा”.





