Nilesh Sable On Sharad Upadhye : ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची धुरा गेली १० वर्ष निलेश साबळे यांनी सांभाळली होती. मात्र या नवीन सिझनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजीत खांडकेकर सांभाळणार आहे, अशी माहिती समोर आली. तर याच संदर्भात प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर मिळालेली अपमानास्पद वागणूक, निलेश साबळे यांच्या डोक्यात हवा गेली असल्याचं म्हणत शरद उपाध्ये यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं. ही पोस्ट सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हारायल झाली आणि चर्चेत आली.
तर यावर निलेश साबळे नेमकं काय आणि कधी बोलणार याकडे साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. तर अखेर यावर निलेश साबळे यांनी सविस्तर मुद्दे मांडत एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. शरद यांनी निलेश यांना टोकत ‘हवा येऊ द्या’च्या सेटवर त्यांना वेळ दिला नसल्याचं म्हटलं आणि त्यांच्याकडे पाहून स्माईलही दिली नाही, असं म्हटलं. यावर आता निलेश यांनी आपलं मत मांडत नेमकं प्रकरण काय होतं याबाबत सविस्तर सांगितलं.
आणखी वाचा – “पाणी विचारलं नाही ही माझी जबाबदारी?”, निलेश साबळेंचा शरद उपाध्येंना थेट सवाल, म्हणाले, “डोक्यात हवा…”
निलेश यांनी व्हिडीओद्वारे म्हटलं, “तुमचं असं म्हणणं होतं की माझ्याशी निलेश साबळे बोललेच नाही. स्टेजवर जाताना निलेश साबळेंनी स्माईल दिली नाही. आणि दुसरं तुम्ही बोलताय की सगळ्या कलाकारांच्या रुममध्ये जात गप्पा मारून झाल्यावर ते शेवटी चार वाजता माझ्यारुममध्ये आले. म्हणजे तुमचा माझा रुममध्ये काहीतरी संवाद झाला. मोठेपणा म्हणून नाही तर माझ्यापेक्षा मोठया असलेल्या प्रत्येकाच्या पहिलं पाया पडून मी त्यांच्या रुममध्ये प्रवेश करतो. तसंच तुमच्याही बाबतीत आहे. आणि याला माझ्याकडे साक्षीदारही आहेत. मला आश्चर्य वाटतं तेव्हा तुम्ही माझं कौतुकही केलं. आपला संवाद झाला. चार नंतर मी स्टेजवर गेलो. स्टेजवर जाताना आता मी कोणती स्माईल देणार. शोच्या आदल्याच दिवशी तुमचा माझा आणि केशव यांचा अर्ध्या तासाचा फोन कॉल झाला. तेव्हा हसत-भासत आपण संवाद केला”.
पुढे त्यांनी म्हटलं, “आधीपासून आपली ओळख नव्हती असंही नाही. त्या भागात इतर कलाकार होते त्यांच्याशी माझा जास्त संवाद झाला, असं तुमचं म्हणणं आहे तर हे कलाकार म्हणजे रामदास पाध्ये. त्यांच्याशी माझं बोलणं आधी झालं नव्हतं कारण ते परदेशात होते. आणि शोच्या दिवशी ते मला भेटले. तसंच अशोक हांडे सरांचा मोठा ताफा आला होता. आणि आपल्या शुटिंगनंतर त्यांचं शूटिंग वेगळं होणार होतं कारण त्यांचे काही डान्स होते आणि कोणत्या गाण्यावर करायचे याबाबत आमची चर्चा सुरु होती. दिग्दर्शकीय धुरा सांभाळायची असते त्यापरीने मी माझ्या माझ्या पद्धतीने प्रत्येकाला योग्य तो वेळ दिला”.





