Astad Kale Angry On Audience : मनोरंजनासाठी आज प्रेक्षकांकडे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. चित्रपटगृहातील सिनेमा, टीव्ही मालिका, ओटीटीवरील वेबसीरिज आणि रंगमंचावरील नाटक. यापैकी नाटक हा एकमेव असा प्रकार आहे, जो प्रेक्षकांसमोर प्रत्यक्ष सादर केला जातो. त्यामुळे कलाकारांकडून होणारी प्रत्येक कृती, संवाद आणि भावना त्या क्षणीच अनुभवली जाते. मात्र यासाठी सभागृहात पूर्ण शांतता आणि प्रेक्षकांची शिस्त तितकीच आवश्यक असते.
अलीकडेच अशाच शिस्तभंगाच्या घटनेमुळे एक नाट्यप्रयोग काही काळ थांबवावा लागला. आस्ताद काळे सध्या ‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकात काम करत आहेत. प्रयोग रंगात आलेला असतानाच प्रेक्षकांपैकी एका व्यक्तीचा मोबाईल फोन वाजला आणि त्या व्यक्तीने तो उचलून मोठ्याने बोलायला सुरुवात केली. फोनवरील संभाषणाचा आवाज रंगमंचापर्यंत पोहोचत असल्याने कलाकारांची एकाग्रता भंग होत होती. अखेर परिस्थिती असह्य झाल्यानंतर आस्ताद काळे यांनी नाटक मधेच थांबवले आणि स्टेजवरूनच त्या प्रेक्षकाला सुनावले. “आम्ही तुमच्या घरी येऊन फोनवर बोलू, तुम्ही इथे येऊन नाटक करा,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आणखी वाचा – “खूप लाजिरवाणी गोष्ट आहे”, ऑस्कर २०२६ मध्ये धर्मेंद्रकडे दुर्लक्ष, हेमा मालिनीचा संताप, ईशा देओल म्हणाली…
मात्र काही क्षणांनंतर त्यांनी स्वतःला सावरत प्रेक्षकांची माफीही मागितली. कलाकाराची व्यावसायिकता आणि प्रेक्षकांबद्दलचा आदर यामुळे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाल्याचे सांगितले जाते. नाटक सुरू होण्यापूर्वी आवश्यक सूचना देण्यात आल्या तरीही घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वातावरण गंभीर झालं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, रंगमंचावरील शिस्त आणि प्रेक्षकांची जबाबदारी यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.




