चित्रपटांमुळे कंगना रणौत बरेचदा चर्चेत असते. मात्र गेली काही वर्ष कंगना रणौतचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात अयशस्वी ठरले आहेत. ‘धाकड’पासून ‘थलायवी’, ‘तेजस’ आणि ‘चंद्रमुखी’पर्यंत असा एकही चित्रपट आलेला नाही ज्या चित्रपटाने चांगली कमाई केली असेल. या चित्रपटांच्या फ्लॉपवर कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने स्वत:ची तुलना शाहरुख खानशी केली आणि म्हटले आहे की, “मोठे सुपरस्टारदेखील त्यांच्या यशापेक्षा जास्त अपयशी ठरतात”. कंगना राणौत लवकरच ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये तिने अभिनय व दिग्दर्शनही केले आहे. हा चित्रपट या वर्षी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे. (Kangana Ranaut On Her Flop Cinema)
कंगना रणौतला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. अभिनेत्रीने ‘टाइम्स नाऊ समिट’मध्ये बॉक्स ऑफिसवर तिच्या चित्रपटांच्या सतत फ्लॉप जाण्याबद्दल भाष्य केलं आहे. इतकंच नव्हेतर अभिनेत्रीने शेवटच्या सुपरस्टार्सपैकी एक असं स्वतःचं वर्णन केलं आहे. कंगना म्हणाली, “संपूर्ण जगात त्याच्यासारखा कोणी नाही. शाहरुख खानचे १० चित्रपट चालले नाहीत, मग ‘पठाण’ने काम केले. माझा एकही चित्रपट ७-८ वर्षे चालला नाही, नंतर ‘क्वीन’ धावली, मग ३-४ वर्षांनी ‘मणिकर्णिका’ धावली. आता पुढचा ‘इमर्जन्सी’ रिलीज होतोय, तुम्हाला माहीत नाही, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करेल”.
त्यानंतर कंगनाने स्वत:ची आणि शाहरुख खानची या पिढीतील शेवटचे सुपरस्टार अशी ओळख करुन दिली. अभिनेत्री म्हणाली, “आम्ही नावाजलेले चेहरे आहोत आणि देवाच्या कृपेने आम्हाला खूप मागणी आहे. पण केवळ कलेच्या क्षेत्रातच मग्न न राहता मला स्वतःला खऱ्या जगाशी जोडायचे आहे”.
कंगना रणौत अभिनयशिवाय आता राजकारणातही उतरली आहे. भाजपने त्यांना हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून तिकीट देऊन उमेदवारी दिली आहे. भाजपने रविवारी २४ मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती, ज्यामध्ये कंगनाचेही नाव होते. कंगना सुरुवातीपासूनच भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची समर्थक आहे.