बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतंच गुपचुप लग्न केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. अशातच आता तिच्यापाठोपाठ अभिनेत्री अदिती राव हैदरीनेही गुपचुप दुसरं लग्न केल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आदितीने काल (२७ मार्च) रोजी दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थबरोबर विवाह केला असल्याचे वृत्तांनी सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. मात्र, काल आदिती राव हैदरी किंवा सिद्धार्थ यांपैकी कुणीही त्यांच्या लग्नाबाबत अधिकृत घोषणा केली नाही.
अशातच आता त्यांचे लग्न झाले असल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे. एका कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकाने दोघांच्या लग्नाच्या बातमीची पुष्टी करत त्यांनी लग्न केले असल्याचे म्हटले आहे. आदिती राव हैदरी लवकरच ‘हिरामंडी द डायमंड बाजार’ या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. त्यामुळे २७ मार्च रोजी या सीरिजच्या निमित्ताने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अदिती व सिद्धार्थ या दोघांचे लग्न निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
‘मिड डे’च्या वृत्तानुसार, ‘हीरामंडी’च्या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालक सचिन कुंभार यांनी आदिती राव हैदरी यांच्या अनुपस्थितीचा उल्लेख केला. यावेळी ते असं म्हणाले की, “अदिती या सीरिजचा महत्त्वाचा भाग असूनही ती या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचं कारण आम्हाला माहीत आहे आणि ते कारण म्हणजे आज तिचं लग्न आहे.” सूत्रसंचालकाच्या या व्यक्तव्यामुळे या दोघांनी लग्न केले असल्याचे म्हटलं जात आहे. त्यामुळे ‘हिरामंडी’च्या कार्यक्रमात आदिती व सिद्धार्थच्या लग्नाच्या वृत्तांवर शिक्कामोर्तब झाला आहे.
अदिती व सिद्धार्थ यांनी २७ मार्च रोजी तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केलं, असं वृत्त ‘ग्रेट आंध्र’नं दिलं होतं. दरम्यान, अदिती व सिद्धार्थने अद्याप त्यांच्या या लग्नाबद्दल कुठेही खुलासा केला नसला तरी लवकरच ते लग्नाचे फोटोज शेअर करतील, असं म्हटलं जात आहे. अर्थात यावर अदिती किंवा सिद्धार्थ यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतरच त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे अनेकजण अदिती व सिद्धार्थ यांनी त्यांच्या लग्नाच्या बातमीची अधिकृत घोषणा करण्याची वाट पाहत आहेत.