बॉलिवूडमधील अभिनेत्री रविना टंडनने ९० चे दशक चांगलेच गाजवले. १९९२ साली तिने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटासाठी तिला ‘फिल्मफेअर’चा ‘बेस्ट डेब्यु फिमेल’ या श्रेणीमध्ये पुरस्कारही मिळाला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या. ती आपल्या अभिनयाबरोबरच वैयक्तिक कारणांमुळेही अधिक चर्चेत राहिली. तिचे नाव अक्षय कुमारबरोबरही जोडले गेले. त्यावरच तिने आता भाष्य केले असून तिच्या व अक्षयच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. (raveena tondon on akshay kumar)
अक्षय व रविना यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘टीप टीप बरसा पानी’ या गाण्याने तर सर्वत्र धुमाकुळ घातला होता. त्यानंतर दोघांची केमेस्ट्रि लोकांना खूप आवडली. दोघांच्या अफेअरच्या चर्चाही खूप रंगल्या. तसेच दोघांचा साखरपुडा होणार होता मात्र काही कारणामुळे होऊ शकला नाही असेही समोर आले. दरम्यान रविना व अक्षयचा साखरपुडा मोडल्याने रविनाने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केल्याचेही सांगितले जात होते. यावर नुकतेच रविनाने साखरपुडा मोडण्याच्या बातम्यांवर भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “हो. आमचा साखरपुडा झाला नाही. पण यामध्ये इतके काय आहे? खूप सारी नाती तुटतात, लोक आयुष्यात पुढे जातात, काही चांगले मित्र बनून राहतात. आम्हीदेखील कदाचित जोडीदार म्हणून योग्य नव्हतो. पण मित्र म्हणून खूप चांगले होतो. त्यामुळे त्यात इतकं काही आहे असं मला वाटत नाही”.
तसेच तिने आत्महत्येच्या अफवांवरदेखील म्हणाली की, “मी एकदम व्यवस्थित होते. पण मीडियाने तेव्हा प्रकरण खूप वाढवले होते. त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा होता. पण आमच्या दोघांमध्ये, आम्हा मित्र-मैत्रिणींमध्ये सर्व काही चांगले होते. तसेच माझ्यासाठी माझे कुटुंब काय विचार करते हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. एका ठराविक कालावधीनंतर कोण काय विचार करतं याचा मला काहीही फरक पडत नाही”.
सध्या रविना ‘पटना शुक्ला’ या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ही सीरिज २९ मार्च रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.