मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या यावर्षी भेटीला आले आहेत. ज्यामध्ये ‘वाळवी’, ‘बाईपण भारी देवा’ सारख्या काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळालं आहे. तर काही चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही. त्यातही काही चित्रपटांची कथा चांगली असूनदेखील त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. असाच एक चित्रपट म्हणजे ‘आत्मपॅम्प्लेट’. (aatmapamphlet movie director share a facebook post)
आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित ‘आत्मपॅम्प्लेट’ चित्रपट शालेय जीवन, वयात येणारा मुलगा, प्रेम आणि त्यानंतर दोन मुलांमधील स्पर्धा या व अशा विविध विषयांभोवती फिरताना दिसतो. अत्यंत अतरंगी व तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा हा चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरला. इतकेच नव्हे, तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी देखील चित्रपटाचे कौतुक केले. असं असूनही चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याच संदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे यांनी एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
हे देखील वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, पोस्ट शेअर केल्यानंतर कलाकारही करत आहेत कौतुक
दिग्दर्शक आशिष बेंडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांनी चित्रपटाच्या शोजचे स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ते या पोस्टमध्ये म्हणाले, “वीक डेजला भरघोस प्रतिसाद मिळू शकेल, असे शोज मिळाले आहेत. असो, विनोदाचा एक भाग पण यात चित्रपटगृह किंवा प्रेक्षकांचा काहीही दोष नाही, अगदी १०००%. मी व माझी संपूर्ण टीम हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो. शेवटी मराठी चित्रपट आणि त्याचं मार्केटिंग आणि पब्लिसिटीचं एक बजेट ठरलेलं असतं. त्या अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाही.”
हे देखील वाचा – आलिया भट्ट झोपली, रणबीर कपूरचं मोबाईलवर लक्ष अन्…; नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान ‘त्या’ कृतीमुळे बॉलिवूड कलाकार ट्रोल, फोटो व्हायरल
“त्यामुळे ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची इच्छा आहे, त्यांनी बुधवारच्या आत तो पाहावा. कारण गुरुवार किंवा शुक्रवारी माझा चित्रपट चित्रपटगृहातून उतरेल, असा माझा अंदाज आहे. त्यामुळे वीकेंडपर्यंत थांबून मग पाहुयात, असा जर विचार करत असाल तर कदाचित तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो. बाकी ज्या प्रेक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे, प्रेम दिलं आहे त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.”, असं म्हणत त्यांनी हे आवाहन केले आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आहे. त्याचबरोबर दिग्दर्शकाचे अभिनंदन करताना दिसत आहे.
आशिष बेंडे दिग्दर्शित हा चित्रपट गेल्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात खुशी हजारे, ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे व केतकी सराफ यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश मोकाशी यांनी केले आहेत.