‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक जितकं प्रेम करतात तितकंच या मालिकेला ट्रोलही केलं जात. गेली सव्वाचार वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सध्या मालिकेत आलेल्या नव्या वळणाने ही मालिका चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने स्वतःच असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मालिकेतील नकारात्मक पात्र साकारत असलेल्या संजनाचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Aai kuthe kay karte promo)
मालिकेत सध्या आशुतोष केळकर या पात्राची एक्झिट झाली आहे. आशुतोष केळकर म्हणजे अरुंधतीचा नवऱ्याचा अपघातात मृत्यू झाला असल्याचं दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे मालिकेला आलेलं हे वळण रंजक ठरतंय. आशुतोषच्या मृत्यूने अरुंधती पूर्णतः खचून गेली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर आशुतोषची आई त्याच्या मृत्यूला सूनेला म्हणजे अरुंधतीला जबाबदार ठरवते. आणि तिला घरातून जायला सांगते. तर एकीकडे हे सर्व पाहून अरुंधतीची पहिली सासू कांचन तिला स्वतःच्या घरी घेऊन येते.
अरुंधतीला कांचन व आप्पा घरी घेऊन येतात हे संजनाला खटकलेलं असतं. संजना अनिरुद्धच्या मनात याबाबत विष कालवण्याचा प्रयत्न करते. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, संजना अनिरुद्धला म्हणते की, “आई अरुंधतीला इथे का घेऊन आल्या आहेत. सुलेखा ताईंनी घरातून हाकलून दिलंच आहे तिला. माझ्यादृष्टीने आईंबरोबर आप्पासुद्धा तिला सपोर्ट करत आहेत”. हे ऐकून अनिरुद्ध म्हणतो, “अर्थात ते सपोर्ट करणारच”. यावर संजना म्हणते, “या सगळ्यात जर आप्पांनी हे घर अरुंधतीच्या नावावर करुन टाकलं तर. जरा विचार कर”, असं म्हणते.
मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी मालिकेला आणि संजनाला चांगलेच खडेबोल लगावले आहेत. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, “आता तरी दिग्दर्शकांनी अरुंधतीला आन्याच्या घरुन जाण्याची बुध्दी द्यावी. सतत काय परत तिथेच आणतात. काही कळत नाही. अजुन तर त्या आरोहीचं नाटकं सुरु व्हायचं आहे”. तर आणखी एकाने संजनाला बोल लगावत म्हटलं की, “संजना कितीही सुंदर असली आणि कितीही उत्तम अभिनय करणारी असली तरी लिड रोल करु शकणार नाही. व्हिलनगिरी नसानसातच आहे”, असं म्हटलं आहे.