‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला प्रेक्षक आता भरभरुन पसंती देत आहेत. मध्यंतरी मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांचा हिरमोड केला होता मात्र आता मालिकेच्या नव्या कथानकांने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेत अरुंधतीचा नवा प्रवास नव्या वेळेत पाहायला मिळत आहे. दुपारी अडीच वाजता ही मालिका प्रदर्शित होत असली तरी या मालिकेला दुपारच्या अडीच वाजताही प्रेक्षक तितकंच भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. (Aai Kuthe Kay Karte Promo)
सध्या मालिकेत आशुतोष केळकरचा मृत्यू दाखवण्यात आल्याने अरुंधतीवर खूप मोठं संकट ओढावलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान सुलेखाताई आशुतोषच्या मृत्यूला अरुंधतीला जबाबदार ठरवतात आणि तिला घराबाहेर काढतात. त्यावेळी कांचन अरुंधतीला स्वतःच्या घरी म्हणजेच देशमुखांच्या घरी घेऊन येते. देशमुख यांच्या घरी आल्याने अरुंधतीला थोडसं बरं वाटतं. ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असते. तर एकीकडे संजनाला अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला आलेली आवडलेलं नसतं.
अशातच आता मालिकेच्या नव्या प्रोमोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये होळीनिमित्त सगळेजण एकत्र जमलेले असतात. तेव्हा अरुंधती सांगते की, “मी आता इथे राहणं योग्य नाही, मी माझ्या घरी निघून जाते”, हे ऐकल्यावर कांचन, आप्पा सगळेच तिला इथे राहण्यासाठी विनवणी करतात. त्यानंतर यश सांगतो की, “पुढच्याच आठवड्यात आमचं लग्न आहे त्यामुळे तू इथेच राहा, नाहीतर मला तुझी काळजी वाटत राहील आणि माझं माझ्या लग्नात लक्ष नसेल”. यशच बोलणं ऐकून अरुंधती देशमुखांच्या घरी राहायला होकार देते. मात्र हे काही संजनाला आवडलेलं नसतं.
त्यानंतर सगळेजण होळी पेटवण्यासाठी तयार असतात. इतक्यात संजना आतून डिवोर्सचे पेपर घेऊन बाहेर येते आणि अनिरुद्धला म्हणते की, “यापूर्वी आपण अनेकदा बोलून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तू मला वेळोवेळी आशा दाखवत राहिलास आणि त्यामुळे डिवोर्स घेण्याचं मी पुढे ढकलत राहिले. आता मात्र ती वेळ आलेली आहे”, असं म्हणत की संजना डिवोर्सचे पेपर अनिरुद्धच्या हातात देते. हे पाहून घरातील सगळ्याच मंडळींना खूप मोठा धक्का बसतो. आता संजना व अनिरुद्ध वेगळे होणार का?, हे मालिकेत येणाऱ्या भागात पाहणं रंजक ठरेल.