‘आई कुठे काय करते’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. आशुतोष केळकरच्या मृत्यूनंतर मालिकेत एक वेगळंच वळण आलं आहे. आशुतोषच्या मृत्यूनंतर अरुंधतीला एकटेपण जाणवत आहे. अरुंधती आता आशुतोषच्या निधनाच्या धक्क्यातून सावरताना दिसत आहे. काही असलं तरी अरुंधतीला आशुतोषची आठवण आल्यावाचून राहत नाही आहे. अशातच मालिकेच्या समोर आलेल्या एका प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या प्रोमोमध्ये अप्पा अरुंधतीची काळजी व्यक्त करताना दिसत आहेत. तर सावरलेली अरुंधती अप्पांची समजूत काढताना दिसत आहे. (Aai Kuthe Kay karte Promo)
एककीकडे अरुंधती देशमुखांच्या घराकडे पाहत तिच्या भूतकाळातील आठवणीत रमते. तितक्यात तिथे अप्पा येतात आणि विचारतात, “अरुंधती अजून झोपली नाहीस का तू?”, यावर अरुंधती म्हणते, “नाही अप्पा. अलीकडे मला झोपच येत नाही. आशुतोष गेले आणि बरोबर माझी झोपही घेऊन गेले”. यावर अप्पा म्हणतात, “अरुंधती तू खूप धीराची आहेस. आग तुझ्या आयुष्याचा आलेख, चढ-उतार बघितले की खूप आश्चर्य वाटतं. प्रत्येक प्रसंगाला तू खंबीरपणे तोंड दिलं आहेस. दुसरी कुणी असती तर, केव्हाच कच खाल्ली असती”. यावर अरुंधती अप्पांना बोलते, “नाही अप्पा. मी धीराची नाही आहे. परिस्थिती माणसाला शिकवत जाते. मला आवडलं नसत का एका लयीत चालणार आयुष्य. पण माझ्या आयुष्यात चढ-उतार येत गेले. आणि रडत बसण्यापेक्षा ते माझ्या आयुष्यातले आरोह-अवरोह आहेत असं मी समजत गेले. आणि त्याचं संगीत झालं आणि लोकांना आवडू लागलं. पण आयुष्य लयबद्ध करायचं तर सगळेच स्वर धरून ठेवायची कसरत करावी लागते”.
यावर अप्पा अरुंधतीच कौतुक करतात. आणि म्हणतात, “वा अरुंधती. आपण नेहमी सकारात्मक बोलावं असं म्हणतो. पण तुझ्याएवढं सकारात्मक दृष्टिकोन मी कोणाकडेही बघितला नाही. बाळा, तू पुन्हा एकदा संगीत विद्यालयात जायला लागलीस आणि तिथे तुला जगण्याची नवी उमेद मिळाली”. यावर अरुंधती म्हणाली, “गाणं माझा आत्मा आहे. आणि मी तिथे जाणं का टाळत होते तेच मला कळत नाही. यश मला तिथे घेऊन गेला आणि मला ते लक्षात आलं. गाणं नाही तर मी नाही. आता मी ठरवलंय, संगीताचे क्लासेस घ्यायचे”.
यावर अप्पा म्हणतात, “आता मला सांग यशच्या लग्नानंतर तू दुसरीकडे राहायला जाणार आहेस का?”, यावर अरुंधती होकार देते. आणि म्हणते, “नका काळजी करू अप्पा. मी लांब गेले तरी आपले संबंध काही संपनार नाहीत. मी कुठे आहे, काय करतेय ते तुम्हाला कळवत राहीन”. यावर अप्पा काळजी व्यक्त करत, “नक्की कळवत रहा. कांचनलाही तुझी काळजी वाटते. ती रात्र-रात्रभर झोपत नाही”. यावर अरुंधती अप्पांना, निश्चित राहण्यास सांगते.