‘स्टार प्रवाह’ वाहिनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. विविध कथानक असलेल्या मालिका नेहमीच स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच घेऊन येत असते. अशातच या वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका गेली सव्वाचार वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. मालिकेत आलेल्या वेगळ्या वळणांनी या मालिकेला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मालिकेतील ट्विस्टमुळे या मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल केलं. अशातच या मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोने प्रेक्षक हलले आहेत. (Omkar Gowardhan On Exit)
अशातच मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोने ही मालिका ट्रोलिंगच्या कचाट्यात सापडली आहे. मालिकेतील अरुंधतीचा नवरा आशुतोष केळकर या पात्राचा मृत्यू दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हे पात्र साकारणारा अभिनेता ओंकार गोवर्धन मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचं समोर आलं आहे. आशुतोषच्या मृत्यूने अरुंधतीसमोरही नवं संकट उभं राहिलेलं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत असून ही मालिका आता नवं कोणतं वळण घेणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. मालिकेतून एक्झिट घेण्याबाबत आशुतोष म्हणजेच ओंकार गोवर्धनने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केल आहे.
मालिकेतून एक्झिट घेण्याबाबत ओंकार म्हणाला, “सेटवरच वातावरण, अभिनय या गोष्टीला मी मिस करेन. पण भूमिकेची कथेनुसार एक्झिट होणार आहे त्यामुळे फार जास्त वाईट मला वाटत नाही आहे. हा मी माझ्या कामाचा भाग समजतो. प्रोमो पाहिल्यानंतर आता लोक असं म्हणत आहेत की, हा प्रोमो खरा नसेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही तुम्हाला खूप मिस करु. आम्ही तुमचे आणि नितीनचे, अरुंधतीचे, सुलेखा ताईंचे भाग खूप मिस करु. लोकांनी हळूहळू प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.
पुढे ओंकार म्हणाला, “सुरुवातीला बॉण्डिंग छान आहे अशा प्रकारच्या कमेंट येत होत्या, आता अगदी उलट हे बॉण्डिंग मिस करु अशा कमेंट येऊ लागल्या आहेत. त्यामुळे माझ्याविषयी प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेलं प्रेम ही गोष्ट मी कमावली आहे. कथेनुसार पात्र संपत असलं तरी सेटवर गेली अडीच वर्ष मी आहे. माझे सर्वाधिक सीन हे अरुंधतीबरोबर झाले आहेत. त्यामुळे दररोज भेटणं होत होतं, तशीच वैयक्तिक मैत्री ही कायम राहील. एकमेकांना आता भेटणं मिस करु, पण बाहेर आम्ही भेटूच. मी अशी अशा करतो की, पुन्हा एकदा आपण एकत्र काम करुच”.