‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. महाराष्ट्रातील तमाम महिलांचे ते सगळ्यात आवडते भावोजी आहेत. पण इथवर पोहोचण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत कौतुकास्पद आहे. सतत काम करत असताना सात ते आठ वर्षांपूर्वी आदेश यांना एका जीवघेण्या प्रसंगाचा सामना करावा लागला होता. याबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
आदेश यांनी दुधीच्या रसाचं सेवन केलं होतं. मात्र दुधी कडू असल्यामुळे त्यांना शारीरिक त्रास जाणवू लागला. दरम्यान त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. याचबाबत त्यांनी ‘मुंबई तक’ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. आदेश म्हणाले, “मला आजही आठवतं की, त्यादिवशीही मला उद्धव साहेबांचा (उद्धव ठाकरे) यांचा फोन आला होता. त्या फोनमुळे मी वाचलो. सवयीप्रमाणे मी सकाळी भाज्यांचा रस प्यायलो. ज्याची मला सवयच होती. सगळ्यांनी लक्षात ठेवा मी पुन्हा एकदा आवाहन करतो की, जर दुधी कडू असेल तर त्यामध्ये दहा नागांचं विष आहे”.
“मी दुधीचा ज्युस प्यायलो. सुचित्राची मीटिंग होती त्यामुळे ती बाहेर गेली. फोनवर बोलता बोलता मी तो ज्युस पित होतो. फोन ठेवल्यानंतर दुसरा फोन उद्धव साहेबांचा आला. त्यांच्याशी बोलत बोलत मी पंधरा-वीस मिनिटं मी घरातच थांबलो. नाहीतर मी शूज घालून कर्जतला शूटसाठी निघणार होतो. २५ मिनिटांमध्ये अचानक मला उलट्या सुरु झाल्या. मोशनलाही सुरुवात झाली. तीन तासांमध्येच मला जवळपास साडे तीन लिटरची रक्ताची उलटी झाली. माझ्या जवळ जे नेहमी असतात सचिन व कुमार त्यांनी मला उचललं. दोघंही मला हिरानंदानी रुग्णालयामध्ये घेऊन गेले. रुग्णालयामध्ये गेल्यानंतर माझा रक्तदाब अगदी कमी झाला होता. हृदयाचे ठोकेही २३ २४ वरुन कमी व्हायला लागले होते”.
आणखी वाचा – गौतमी पाटीलला कोकणात प्रवेश नाही, कार्यक्रमाला विरोध, पण यामागचं नेमकं कारण काय?
“रुग्णालयामधून सांगण्यात आलं की, सुचित्राला लगेच बोलवा आता आमच्या हातामध्ये काहीच नाही. सुचित्राही लगेच पोहोचली. सुचित्रा येईपर्यंत माझे डोळे बंद झाले होते. पण त्यावेळी काय जादू झाली हे आजपर्यंत मला माहिती नाही. ६.३० वाजेपर्यंत मी डोळे उघडले तेव्हा माझ्यासमोर सोहम, सुचित्रा व उद्धव साहेब उभे होते. माझ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडून गेलं हे मला त्या काही वेळामध्ये कळलंच नाही. आपली आजी करायची ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणतीही भाजी करण्यापूर्वी थोडी खाऊन बघा”. आदेश यांनी सांगितलेला हा प्रसंग मनाला चटका लावून गेला.