प्रत्येक स्त्रीला माहेरची नितांत ओढ असते. तिच्या आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे माहेरच्या मातीत गेलेली असतात. आई-वडील, भावंडे, माहेरची माणसं, गाव, माती निसर्ग यांबद्दल अनामिक आकर्षक तिला असते. त्यामुळे सणावारानिमित्त अनेक माहेरवाशीनी माहेरी जातात. दिवाळीच्या सणानिमित्त अनेक मराठी अभिनेत्रीही माहेरी गेल्या आहेत. अशा काही अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदार यंदाच्या दिवाळीसाठी आपल्या माहेरी गेल्या असून त्यांनी अनेक वर्षांनी भावाबरोबर भाऊबीज साजरी केली आणि यानिमित्त त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. विशाखा यांनी भावाबरोबरचा फोटो शेअर केला आहे आणि एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी आपल्या काही भावनाही शेअर केल्या आहेत. (Vishakha Subhedar Bhaubeej Post)
या पोस्टमध्ये विशाखा यांनी असं म्हटलं आहे की, “अनेक वर्षांनी आमची भाऊबीज साजरी झाली. दादा दिवाळीला दुबईला असायचा कारण सर्व्हिस. यावर्षी मात्र सुट्टी होती आणि आमची भाऊबीज साजरी झाली. अचानक दोघांचे रंग जुळले. ट्युनिंग का काय म्हणतात तसं झाल. खऱ्या अर्थाने माहेरपण उपभोगलं. पूर्वी लांबच्या गावात मुलगी दिलेली असायची.. मुलगी माहेरपणाला आली की महिनाभर रहायची. पण ते सुख जवळ लग्न होणाऱ्या पोरींच्या नशिबी फार कमी येतं. आमचं माहेरपण म्हणजे ७-८ तासाचं. फार-फार तर चार दिवस. अर्थात सासूबाई मागे लागायच्या, नवरा चल म्हणायचा असं काहीच नसायचं. पण आम्हालाच करमायचं नाही. आपण कधी एकदा आपल्या घरी जात आहोत असं वाटायचं”.
आणखी वाचा – जान्हवी किल्लेकरने दिलेला शब्द पाळला, सूरज चव्हाणच्या गावी साजरी केली भाऊबीज, म्हणाली, “फक्त एक हाक…”
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “खरच असं खूपदा वाटतं सुट्ट्या काढून माहेरी जाता यायला पाहीजे. (आम्ही जायचो लहानपणी असे आई आणि मावशीबरोबर) आपल्या भाच्याबरोबर दुपारी झाडाखाली पत्ते कुटता यायला पाहिजे. सुट्टीत आलेल्या बहीणींच्या उवा काढता आल्या पाहिजेत. भाचरांचे पाढे पाठ करून घेता आले पाहिजेत. चिंचा फोडता आल्या पाहिजेत. झोके घेता आले पाहिजेत. भांडी घासता घासता, आयुष्य बोलता बोलता डोळ्यांत पाणी यायला हवं आणि पुसायला बहिणीचा आईचा पदर असायला हवा. हे सगळं माहेरपण आमच्या आया-मावशींनी अनुभवलं. आम्हा बच्चे कंपनीचे लाड करता करता सकाळी गरम चहा चपाती, दुपारी गरम त्यांच्या आयांच्या हाताचं मटण, चिल्लसखेळ, बांगड्यांमचे खेळ आणि पोतपोत गहू निवडून देऊन आईचं काम कमी करणं हे सगळे दुपारचे उद्योग आणि रात्री अंगणात भावडांबरोबर गप्पा आणि मग जायची वेळ यायची”.
आणखी वाचा – लेक अबरामसाठी शाहरुख खानने खरेदी केली कोट्यवधींची कार, फक्त मोजक्याच व्यक्तींकडे आहे ही गाडी, फोटो व्हायरल
यापुढे विशाखा यांनी असं म्हटलं की, “सगळी मज्जा झाली की, आम्ही रडत कढत गाड्या पकडायचो. काय गंमत होती. पूर्वीच्या शेणाने सारवलेल्या माहेराची. आज माहेरची ओढ कायम आहे पण वेळ कमी आहे. धावपळीचं आयुष्य… प्रेम आहेच ते असणारच… पण गोंजारायला वेळ नाही… फक्त धावपळ… पण जवळ असल्याने कधीही पाच मिनिटासाठी का होईना आईकडे डोकावत येतं. हेही तितकच खरं. मज्जा असते सणवारी, पण सुट्टी मिळाली तरच मज्जा आहे. थोडं विषयांतर झालं पण मनात आल ते लिहित गेले”. दरम्यान विशाखा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.