एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आजवर साऱ्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अनेकदा तो त्याला आलेले अनुभव चाहत्यांसह शेअर करतो. संकर्षण हा विठूभक्त आहे. विठ्ठलाच्या भक्तीत नेहमीच तो तल्लीन झालेला पाहायला मिळाला आहे. सध्या संकर्षण ड्रामा ज्युनियर्स या रिऍलिटी शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम पाहत आहे. आषाढी एकादशी या विशेष भागात संकर्षणने एक भावुक करणारा किस्सा सांगितला. त्यावेळी त्याच्यासह उपस्थितांचेही डोळे पाणावले. (Sankarshan Karhade Video)
संकर्षण म्हणाला, ”माझे बाबा बँकेत उत्तम नोकरी करुन रिटायर झाले. पण दरवर्षी न चुकता ते पंढरपुरला सेवेला जातात. तिथे सेवा म्हणून ते पावती फाडा, लोकांच्या चपला नीट ठेवा, कोणाला रांग सापडत नसेल तर त्यांना त्या ठिकाणी सोडा अशा सेवा ते तिथे करतात. मागच्या वर्षी मी त्यांना विचारलं काय बाबा कसं काय चालू आहे सगळं. पावती वगैरे फाडताय. तेव्हा ते मला म्हणाले की आपण तिरुपती बालाजीला जातो तेव्हा तिथे कोणी अंगठी दान करतं, कुणी माणिक टाकतं, कोणी खडा टाकतं पण पांडुरंगाच्या इथे पावत्या ११ रुपयांच्या फाडतात. कोणी ११ रुपये देता तर कोणी २१ रुपये देता. बाबा म्हणाले इतका गरीब आमचा देव आहे”.
पुढे तो असेही म्हणाला की, ”तेव्हा माझ्या बाबांनी सांगितलं आज तुला एक अनुभव सांगतो. ते म्हणाले, एक मुलगा माझ्याकडे सकाळी आला तो रडत होता. मला म्हणाला माऊली अकरा रुपयांची पावती फाडा. पण त्याचे डोळे पाणावले होते त्यामुळे बाबांनी त्याला विचारलं तू रडतोस का?, तेव्हा तो म्हणाला, पहाटे चंद्रभागेला आंघोळीला गेलो होतो पण तिथे माझी आई हरवली. बाबांनी त्याला विचारलं आई हरवली कुठे? तो म्हणाला चंद्रभागेत आंघोळीला गेलेलो तेव्हा ती गर्दीत कुठेतरी हरवली आहे. तुम्ही लवकर पावती फाडा ११ रुपयांची. तेव्हा माझ्या बाबांनी स्वतःच्या खिशातले १०० रुपये त्या पावतीत फाडले तसेच त्याचे ११ रुपये ही त्यात ऍड केले”.
”अशी १११ रुपयांची पावती फाडली आणि त्याला हाताशी धरुन बाहेर घेऊन गेलो. आणि त्याला म्हणालो, तो कळस बघ तुझी माऊली तुला लवकरच सापडेल. काही काळजी करु नकोस. हरवलेल्या त्या माऊलीचं वय ८० वर्ष. बाबांनी त्याची पावती फाडली आणि तो निघून गेला. अर्ध्या तासाने तो परत आला आणि बाबांच्या पायावर डोकं ठेवलं. म्हणाला, माऊली तुमच्या शब्दात काय ताकद आहे. ही बघा माझी ८० वर्षांची आई सापडली. आयुष्यात हरवलेल्या सर्व लोकांना सावरणारी ही माय माऊली एकच आहे ती म्हणजे पंढरीची माऊली. तो पाहिजे तेव्हा माय आहे, पाहिजे तेव्हा बाप आहे. असा हळवा करणारा देव जगात कुठेच नाही. म्हणूनच तो आज लाखो वारकऱ्यांचा पोशिंदा आहे. लाखो वारकऱ्यांचे आशास्थान आहे. सातारकर महाराज यांच्या कीर्तनामध्ये नेहमी म्हणतात की पांडुरंगाचे हात कमरेवर का आहेत. कारण तो नेहमी म्हणतो की चंद्रभागेचं पाणी कमरे एवढेच आहे घाबरु नको तू ये पुढे”, संकर्षणने सांगितलेला हा किस्सा साऱ्यांच्या मनाला स्पर्शून गेला.