बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. न पटणाऱ्या अशा मुद्द्यांवर ते खुलेपणाने आपले मत मांडताना दिसतात. मात्र ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमीवेळा बोलताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मोठ्या मुलाच्या मृत्यूबद्दल खुलेपणाने भाष्य केलं. मोठ्या लेकाच्या निधनाचे कारणही त्यांनी सांगितले आणि हे सांगताना ते भावूक झालो. नाना पाटेकर यांनी सांगितले की, “त्यांचा मोठा मुलगा हा जन्मापासून कसा अडचणीत होता आणि त्यामुळेच त्याला आपला जीव गमवावा लागला”. (Nana Patekar Emotional Incident)
नाना पाटेकर यांनी ‘द ललनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत आयुष्यातील या कठीण काळाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, “माझ्या मोठ्या मुलाला एका डोळ्याची समस्या होती. त्याला दिसत नव्हते. मी त्याचा इतका तिरस्कार करु लागलो की, जेव्हा मी त्याला बघितले तेव्हा मला प्रश्न पडला की नानांचा हा असा कसा मुलगा आहे. याबद्दल लोक काय विचार करतील. त्याला काय वाटले किंवा कसे वाटले याचा मी विचार केला नाही. मी फक्त माझ्या मुलाबद्दल लोक काय विचार करतील याचा विचार केला. त्याचे नाव दुर्वासा ठेवले होते. त्याने आमच्याबरोबर अडीच वर्षे घालवली पण तुम्ही काय करु शकता. आयुष्यात काही गोष्टी निश्चित असतात”.
नाना पाटेकर यांनी आपल्या मुलाचे नाव नेहमी संतप्त ऋषी दुर्वासा यांच्या नावावरुन ठेवल्याचा खुलासा केला. त्यांची पत्नी नीलकांतीशी कशी भेट झाली हेही सांगितले. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्यांची भेट एका नाटकादरम्यान झाली होती. ती बँक ऑफिसर होती. तिला अडीच हजार रुपये पगार होता. नीलकांतीने नानांना सांगितलं होतं की, नाटक वगैरे करायचं असेल तर करु शकतो कारण तिथूनही पैसे कसेही येतील.
नाना पाटेकर यांनी सांगितले की, त्यांच्या बहिणीमुळे त्यांनी सिगारेट पिणे सोडले होते. ते म्हणाले, “माझ्या बहिणीमुळेच मी धूम्रपान सोडले. त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा यामुळेच गमावला होता. त्यावेळी मी दिवसाला सुमारे ६० सिगारेट ओढत असे. अंघोळ करतानाही मी सिगारेट ओढायचो. पण हे खूप वाईट आहे. वासामुळे माझ्या गाडीत कोणी बसत नव्हते. मी कधीच दारू प्यायलो नाही पण खूप धुम्रपान केले. माझ्या बहिणीने मला धूम्रपान केल्यानंतर खोकत असताना पाहिले. आणि ती म्हणाली, “अजून काय बघायचं आहे?”, हे ऐकून नाना पाटेकरांना खूप वाईट वाटले. आणि त्या दिवसापासून त्यांनी धूम्रपान सोडले.