२०२३ हे वर्ष आता संपायला आले असून सरत्या वर्षाला निरोप देताना या वर्षातील काही घटना, प्रसंगांना अनेक उजाळा देत आहेत. अशातच यंदाच्या वर्षी मराठी चित्रपटांनी चांगलीच कामगिरी केली. यंदा मराठीत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यात ‘जग्गू आणि ज्युलिएट’, ‘सरला एक कोटी’, ‘टर्री’, ‘फुलराणी’, ‘रौंदळ’, ‘सातारचा सलमान’, ‘वाळवी’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ ते नुकताच प्रदर्शित झालेला ‘झिम्मा-२’ यांसारखे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यांपैकी ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘बाईपण भारी देवा’ व ‘झिम्मा-२’ या चित्रपटांना चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. ‘झिम्मा २’ हा चित्रपट आजही चित्रपटगृहांमध्ये टिकून आहे. या चित्रपटाने आतापर्यंत मोठी कमाई केली असून अजूनही या चित्रपटाची घौडदौड कायम आहे. अशातच गत वर्षाला निरोप देताना ‘इट्स मज्जा’ने ‘झिम्मा-२’च्या कलाकारांबरोबर ‘राऊंड टेबल’ हा खास मुलाखतीचा कार्यक्रम केला. यात ‘झिम्मा-२’ मधील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री निर्मिती सावंत, चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमे व या चित्रपटाची निर्माती व अभिनेत्री क्षिती जोग यांनी सहभाग घेतला होता. (Majja Round Table With Jhimma 2 Team)
“सध्या मराठी चित्रपट बघायला प्रेक्षकांना बोलावणे हे खुप दुर्दैवी आहे” असे मत अशोक सराफ यांनी ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात मांडले होते. अशोक सराफ यांच्या या वक्तव्यावरुन या कलाकारांनाही प्रमोशनचा प्रश्न विचारण्यात आला. यावर क्षिती जोग उत्तर देत असं म्हणाली की, “अशोक मामांचं हे मत मला कळत आहे. पण सध्याचा काळ हा अनेक पर्यायांचा आहे. २० वर्षांपूर्वी आजच्या इतकी माध्यमे उपलब्ध नव्हती. २० वर्षांपूर्वी फक्त मराठी चित्रपट आणि काही चॅनेल्स उदयास आले होते. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना मनोरंजनाची फारशी साधने उपलब्ध नव्हती. मात्र आता तशी परिस्थिती नाही आहे. आता ओटीटी व इंटरनेटमुळे प्रेक्षकांना अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आता अनेक पर्याय उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना नवीन चित्रपटाची आठवण करुन देणे गरजेचे आहे.”
यापुढे हेमंतने असे म्हटले की, “पूर्वीच्या काळी मनोरंजन हे दुर्मिळ होते. पूर्वी एखाद्याच्या घरी भजन, जागरण, गोंधळ असला तर लोक ते पाहण्यासाठी एकत्र जमायचे. पण आता मोबाईल व इंटरनेटमुळे ते सहजसोपे झाले आहे.” तसेच निर्मिती सावंत यांनीही “पूर्वीच्या काळी प्रमोशनची पद्धत वेगळी होती. तेव्हा फक्त वर्तमानपत्रात जाहिरात यायची. पण आता नाटकाचा प्रेक्षकही नाट्यगृहाबाहेर न जाता मोबाईलवर नाटकाची तिकीटे बुक करतात.” असं म्हटलं. तर सिद्धार्थनेही यापुढे त्याचे मत मांडताना असे म्हटले की, “सध्याचा काळ मनोरंजनाच्या दृष्टीने कमी झाला असून सर्वांना ३० सेकंदांचे रील व्हिडीओ बघण्याची सवय झाली आहे. त्यामुळे अशा प्रेक्षकांना दोन तासाचा चित्रपट बघायला बोलावण्यासाठी प्रमोशन हे करावेच लागते.”
दरम्यान, ‘झिम्मा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली असून या चित्रपटाने पाचव्या आठवड्यातही यशस्वी पदार्पण केले आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने बॉलिवूडच्या शाहरुख खान व प्रभास यांसारख्या मोठ्या कलाकारांच्या ‘डंकी’ व ‘सालार’बरोबर बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवून ठेवले आहे. त्यामुळे चित्रपटाचे व चित्रपटातील कलाकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.