१८ वर्ष सातत्याने प्रयत्न केल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरने IPL च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरलं. टीमच्या सगळ्या खेळाडूंसाठी तसेच विराट कोहलीसाठी हा अभिमानाचा क्षण होता. विराटचे कुटुंबियही आनंदाने नाचू लागले. आरसीबीचा सामना असताना अनुष्का शर्मा नेहमीप्रमाणे विराटला प्रोत्साहित करण्यासाठी स्टेडियमवर हजर होती. त्याचबरोबरीने त्याच्या कुटुंबातील इतर मंडळीही त्याला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देत होते. आरसीबीच्या विजयानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला. विराटची बहीण भावना कोहलीनेही त्याच्यासाठी कौतुकास्पद पोस्ट शेअर केली. मात्र विराट-अनुष्काबरोबर तिचं नातं बरोबर नाही हे दाखवून देण्याच्या उद्देशाने एका नेटकऱ्याने भावनाला डिवचलं. यावरच तिने आता सडेतोड उत्तर दिलं आहे. (Bhawna Kohli Dhingra troll)
भावनाने विराटसाठी खास पोस्ट शेअर केली. तिने म्हटलं की, “ज्यांनी आम्हाला हसवलं, रडवलं त्या सगळ्यावर मात करत सेलिब्रिट करण्याची ही रात्र, हा क्षण आणि हे स्वप्न आहे. पण तुम्ही खूप वाट पाहायला लावली. हे खरंच सत्य घडत आहे हे शांत वातावरणात आणि एकांतात अनुभवण्याची गरज आहे. आरसीबीच्या चांगल्या आणि वाईट क्षणांमध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या हजारो लोकांचे आभार, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही”.
आणखी वाचा – बंगळुरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचं तांडव, विवेक ओबरॉयची पोस्ट, म्हणाला, “जवळच्या माणसांना गमावणं…”
“कारण हा विजय प्रत्येकाचा वैयक्तिक विजय आहे. तुझं रडणं सगळ्यांनीच अनुभवलं जे तुझ्यावर खूप प्रेम करतात. आम्हीही तुझ्याबरोबर रडलो. कारण तू माझा छोटा वीरु आहेस. देवाने निवडलेला तू व्यक्ती आहेस, जो सगळ्यांना आयुष्यात प्रेरणा आणि आनंद देतोस. हे सगळं पाहून मी धन्य झाले. स्वर्गामध्ये कोणाच्या तरी चेहऱ्यावर सुंदर हास्य आहे. ज्याला त्याच्या मुलाला पाहून गर्व होत आहे”.
आणखी वाचा – वडील सुपरस्टार तरीही कामासाठी वणवण; शेखर सुमन यांच्या लेकाची खंत, म्हणाला, “दोष इंडस्ट्रीला देऊ का?”

भावनाच्या या पोस्टवर नेटकऱ्याने एक विचित्र कमेंट केली. “तो (विराट) त्याच्या भाषणामध्ये कधीच तुझ्या नावाचा उल्लेख का करत नाही?. तुझी कोणतीच पोस्ट लाइकही करत नाही. इतकंच काय तर अनुष्काही तुझी कोणतीच पोस्ट लाइक करत नाही”. यावर भावनाने अगदी शांतपणे कमेंटला उत्तर दिलं. ती म्हणाली, “प्रेम हे वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त केलं जातं, हे समजण्याची ताकद देव तुम्हाला देवो. तुमच्या आयुष्यातही खूप प्रेम आहे अशी आशा करते. आयुष्यात कोणतीच असुरक्षितता नसेल. फक्त खरी नाती असतील ज्यामध्ये कोणताच दिखावा नसेल. देव तुमचं भलं करो”. भावनाने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये तिचं मत मांडलं.