विश्वचषक २०२३ या यंदाच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. यामुळे तमाम भारतीयांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. अनेक मराठी कलाकारांनी यासंदर्भात पोस्ट शेअर करत व्यक्त केलेल्या भावना लक्ष वेधून घेत आहेत. अशातच अभिनेता जितेंद्र जोशी याने शेअर केलेली भावुक पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. (Jitendra Joshi On Cricket World Cup 2023)
जितेंद्र जोशी याने पोस्ट शेअर करत भारताच्या पराभवावरून नाराजी व्यक्त केली असली तरी सर्व खेळाडूंच्या या सिरीजमधील यशस्वी खेळाचं कौतुकही केलं आहे. इतकंच नव्हे तर विजेतेपद पटकवलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला शुभेच्छाही दिल्या आहेत. पोस्ट शेअर करत जितेंद्र जोशी म्हणाला की, “आता पराभवानंतर काहीजण आपल्या संघाबद्दल वाईट प्रतिक्रिया देतील, त्यांच्याबद्दल उलटसुलट बोललं जाईल आणि टीकाही करण्यात येतील. काही नेटकऱ्यांनी तर आधीच बालिश मीम्स बनवले आहेत. पण, या संपूर्ण सीरिजमध्ये आपल्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली हे विसरून चालणार नाही.
यापुढे भारतीय संघाचं कौतुक करत अभिनेता पुढे म्हणाला, “आपल्या टीमचा मला प्रचंड अभिमान आहे कारण, एकही सामना न गमावता त्यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. आपल्याला स्वप्न दाखवली. यंदा आपण जिंकू असा विश्वास आपल्यात निर्माण केला. आपण सगळे एक प्रेक्षक व कुटुंब म्हणून एकत्र खेळलो. शेवटी हा एक खेळ आहे! कुणाला जिंकण्यासाठी कुणाला तरी हार मानावी लागते. हा दिवस आपला नसला तरी आपली टीम खूप चांगला खेळ खेळली आहे. आता मी खरंच दु:खी आहे पण त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही. त्यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. आपल्या सर्वांच्या वतीने ते मैदानात खेळले”.
“आपण या विश्वचषकात सर्वोत्कृष्ट ठरलो नाही याचा अर्थ आपण हरलो असा होत नाही. माझ्या टीमला माझा कायम पाठिंबा आहे. मी कायम त्यांच्याबरोबर आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन. तुम्ही आमच्यापेक्षा चांगला खेळ खेळलात!” असं म्हणत जितेंद्र जोशीने विश्वचषकात खेळून विजेतेपद पटकवलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच भारतीय संघाचं कौतुक करत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.