why vishakha subhedar quit maharashtrachi hasyajatra show : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा आता मोठा चाहतावर्ग आहे. या कार्यक्रमातील कलाकारांना प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. गेली कित्येक वर्ष विशाखा प्रेक्षकांना पोट धरुन हसवते. तिने जेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये एण्ट्री केली तेव्हा प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद झाला. या कार्यक्रमाच्या मंचावरही तिने विविध पात्र साकारत प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. पण काही महिन्यांपूर्वीच विशाखाने या कार्यक्रमाला रामराम केला. पण असा निर्णय तिने का घेतला?, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाबरोबर तिचं काही बिनसलं होतं का? याविषयी विशाखाने भाष्य केलं आहे.
‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’ या कार्यक्रमात विशाखाने हजेरी लावली होती. यावेळी तिने विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबतही ती व्यक्त झाली. दरम्यान “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडली?” असा प्रश्न विशाखाला विचारण्यात आला. तेव्हा तिने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. ती म्हणाली, “१३ वर्ष मी स्किट फॉर्ममध्ये काम करत होते. मला स्वतःला काहीतरी वेगळं करायचं होतं. स्किट झाल्यानंतर कोणी त्यावर ओके म्हणावं किंवा जजमेंट द्यावं, आज काम चांगलं नाही झालं, सतत परिक्षेला स्वतःला उतरवायचं याचा मला कंटाळा आला होता. आपल्या कामाचं आपल्याला समाधान मिळालं पाहिजे. आपल्याला वाटलं पाहिजे की आज माझ काम छान झालं”.(Vishakha subhdar talk about maharashtrachi hasyajatra)
“आपलं काम दुसऱ्यावर आधारित राहिलं की समाधानाची पुडी बांधता येत नाही. माझंही तसंच झालं होतं. एखाद्या वाक्यात मी पुढे काही करु शकत नाही हे मला कळतं. पण तरीही तू काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं, मज्जा आली नाही हे मी पुन्हा नाही ऐकू शकत. मी माझा शिखर चढली आहे. त्यासाठी मी खूश आहे. माझ्या शिखरावर मी झेंडा लावला आहे. परत परत तो झेंडा मी तिथे जाऊन कशाला रोवू?. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये कोणी माझा अपमानच करत आहे, कोणी मला योग्य वागणूक देत नाही म्हणून मी कार्यक्रम सोडला अशामधील काहीच भाग नाही”.(why vishakha subhedar quit maharashtrachi hasyajatra show)
“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये माझे खूप लाड झाले. मला या कार्यक्रमामध्ये फटकारलं तसेच टोमणेही मारले. प्रत्येक कलाकाराला त्याचं काम चुकलं तर बोलणी खावी लागतात. तसेच चांगल्या कामाचं कौतुकही होतं. माझंही झालं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडल्यानंतर मी स्वतः कुठे आहे हे बघायला मजा आली. तुम्ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ उगाच सोडलं असे खूप लोक अजूनही मला बोलतात. पण मी पुन्हा हा कार्यक्रम करु शकत नाही असं म्हणते”. विशाखा आता पुन्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काम करताना दिसणार का? हे पाहावं लागेल.