छोट्या पडद्यावरील ‘अवघाची हा संसार’ व ‘तुजविण सख्या रे’ या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात अक्षरश: घर केले. आज इतक्या वर्षांनीही या मालिकांची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. या मालिकेच्या कथानकासह शीर्षकगीतांनी साऱ्यांनाच वेड लावले. याच मालिकांतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे कादंबरी कदम. ‘अवघाची हा संसार’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या कादंबरीने काही वर्षांपूर्वी लग्न केले आणि मनोरंजन विश्वापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
कादंबरीची ‘तुजविण सख्या रे’ ही मालिका विशेष गाजली होती. यातील गाणी व कथानकाने प्रेक्षकांना वेड लावले होते. यानंतर कादंबरीने अनेक चित्रपटांमध्येही काम केले. मात्र गेल्या दहा वर्षांपासून तिने कोणत्याच शोमध्ये काम केले नाही. पण अभिनेत्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कादंबरीने नुकतीच ‘आरपार’ला मुलाखत दिली आणि या मुलाखतीचा एक व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये तिने स्त्री-पुरुष समतेवर, त्याचबरोबर स्त्री व पुरुषांमधील काही विशिष्ट कामे व जबाबदारीवर भाष्य केले आहे. यात तिने असं म्हटलं की, “तो (नवरा) थकून आला आहे. त्यामुळे त्याने घरी दोन गोष्टी नाही केल्या तरी चालतात. तुम्ही जेव्हा वडील थकून घरी येतात तेव्हा मुलांना आपण सांगतो की, थांब बाबा आताच थकून आला आहे. त्यांना हातपाय धुवू दे, त्यांना फ्रेश होऊदे. पण आई थकून घरी आली की, आपण तिला असं म्हणतो की, तो (बाळ) तुझी सकाळपासून वाट बघत आहेत. हा फरक आहेच ना? त्याचं काय करायचं.”
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी त्यादिवशी ट्वींकल खन्ना कुणाची तरी मुलाखत घेत होती ती पाहिली. तेव्हा ती असं म्हणाली की, आपण आता पैसे कमावत आहोत. सगळं करत आहोत. पण तरी उद्या दुपारच्या जेवणात काय करायचं? हा प्रश्न आहेच आणि हा खूपच त्रासदायक प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला नाही माहीत. म्हणजे आपल्याकडे स्वयंपाक करणारी बाईदेखील आपल्याला (महिलांनाच) हा प्रश्न विचारते की, “ताई आज जेवण काय करायचं?” म्हणा ना “दादा आज काय बनवायचं?” दरम्यान, कादंबरी ही सध्या ‘चारचौघी’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.