tharala tar mag news updates : ‘ठरलं तर मग’ मालिकेची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. विलास खुनाचा निकाल काय लागणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. मधुभाऊ या केसमधून सुटणार का?, हा मोठा सवाल सर्वांसमोर होता. अखेर निकालाचा तो दिवस आलाच. अर्जुनने सर्वतोपरी प्रयत्न करुन ही केस लढली आणि अर्थात विजयही मिळवला. विलास खुनात साक्षी आणि प्रिया यांचा कसा हात आहे हे अर्जुनने भर कोर्टात उघड केले. अर्जुनने यावेळी संधी साधत प्रियाला निशाण्यावर ठेवलं. प्रियावर दबाव टाकला तर नक्कीच ती खरं सांगेल याची खात्री अर्जुनला होती, म्हणून तो प्रियाला उलट तपासणी करताना दिसला.
अर्जुनने प्रियावर दबाव टाकत विलासचा खून तूच केला आहेस, त्यामुळे खरं काय घडलं होतं ते आताच्या आता सांग असं म्हणतो. साक्षीने केलेल्या खुनाची शिक्षा मी का भोगू असा विचार करत प्रिया देखील खरं काय घडलं ते बोलायचं ठरवते. प्रियाचा संयम सुटतो आणि ती साक्षीच्या विरोधात सर्वकाही बोलून मोकळं होते. साक्षीला विलासवर गोळी झाडताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय असं प्रिया सांगते. तिच्या कबुलीनंतर सगळेच हादरतात. प्रियाची वागणूक पाहून रविराज किल्लेदार निराश होतात. यानंतर प्रियाला दामिनी काही प्रश्न विचारते. पण, गेली दोन वर्षे मी खोटं बोलले, साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न केला पण आता शक्य नाही, असं सांगत प्रिया साक्षीनेच गोळी झाडली या मतावर ठाम राहते.
पुढे, अर्जुन शेवटचे काही प्रश्न विचारण्यासाठी साक्षीला बोलावतो, खून तुम्ही केलाय हे तुम्हाला मान्य आहे का? असा प्रश्न तो तिला विचारतो. आता प्रियाने कबुली दिल्यावर साक्षीकडे नाही म्हणण्याचा पर्यायच उरत नाही. मी या माझ्या हातांनी विलासवर गोळी चालवलीये असं ती भर कोर्टात मान्य करते. याशिवाय विलासला गोळी लागल्यावर मी आश्रमातून निघून गेले आणि त्यानंतर प्रत्येक पुरावा प्रियाने मिटवला. तिनेच पिस्तुलावर मधुभाऊंचे ठसे घेतले असं साक्षी सांगते.
आणखी वाचा – ७५० इंजेक्शन्स, दोन्ही किडनी फेल आणि…; ‘नायक’मधील अभिनेत्याचा आजारपणाचा काळ, जगतोय असं आयुष्य
यानंतर अर्जुन साक्षी व प्रिया दोघी या खुनात सहभागी असल्याने दोघींना कठीणातील कठीण शिक्षा व्हावी असं म्हणतो, तर इकडे मधुभाऊ सुटले म्हणून सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहताना दिसतो. तर मधुभाऊही सुटकेचा श्वास सोडतात. प्रियाच्या वागणुकीने मात्र सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब प्रचंड रागवलेले असतात. तर इकडे केस हरल्याने दामिनीही रागात निघून जाते.





