ankita walawalkar shares angry post : ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरांत पोहोचलेली स्पर्धक म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिताने आजवर तिच्या मालवणी, कोकणी संवादाने रसिकांच्या मनात घर केलं. ‘बिग बॉस’च्या घरात असताना आणि घराबाहेरही अंकिताला बरंच ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता ती नेहमीच रसिकांच मनोरंजन करताना दिसली. सोशल मिडियावर अंकिता बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. अशातच अंकिताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर संताप व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटसमोर कचरा करणाऱ्यांना सुनावलं आहे.
या व्हिडीओमध्ये तिने म्हटलं आहे की, ” गेटवर नाव महाराजांचं पण समोरचं दृश्य लाजिरवाणं. एक लक्षात घ्या इतिहास फक्त पुस्तकांत नसतो, तो आपल्या आजूबाजूच्या जागांमध्येही असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर आपल्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख जिथे होतो, तिथे आपोआपच अभिमान आणि आदराची भावना जागी होते. परंतु आज अनेक ठिकाणी ‘शिवाजी महाराज चौक’, ‘शिवाजी महाराज गेट’अशा ऐतिहासिक नावांखाली असलेल्या जागांभोवती घाण, कचरा, निष्काळजीपणा आणि बेफिकिरीचं दु:खद चित्र दिसून येतं. किती विसंगती आहे ही, एकीकडे महाराजांचा जयघोष, दुसरीकडे त्यांच्या नावाजवळच साचलेला कचरा. हे फक्त त्या जागेचं नाही, तर आपल्या मानसिकतेचंही द्योतक आहे”.
पुढे तिने म्हटलं की, “शिवरायांच्या विचारांनी चालणं म्हणजे फक्त गड किल्ले बघणं नव्हे, तर स्वच्छता, शिस्त, आणि सजग नागरिकत्व हे त्यांच्या आदर्शाचं खरे अनुकरण आहे. मग आपण रोज ज्या गेटखालून पाटीला नमस्कार करतो, तिथं जर आपणच प्लास्टिक, घाण, थुंकी आणि कचऱ्याचा ढीग ठेवत असू तर तो नमस्कार केवळ दिखावा आहे का?. आज गरज आहे ती फक्त ‘शिवप्रेम’ बोलण्यात नसून, ते कृतीत दाखवण्याची. ‘गेटवर महाराजांचं नाव, पण समोर कचरा, हा अपमान नाही का आपल्या इतिहासाचा?’. आपण जर खरंच शिवरायांवर प्रेम करत असू, तर त्यांच्या नावाने असलेल्या प्रत्येक स्थळाला म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ आणि सन्माननीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे”.
शेवटी मोलाचा सल्ला देत अंकिता म्हणाली, “समाज, नगरपालिका आणि स्थानिक नागरिक सर्वांनी मिळून हे लक्षात घ्यायला हवं. शिवरायांचं नाव म्हणजे शौर्य, स्वच्छता आणि स्वाभिमान. तो आपल्या कृतीनं दाखवूया. महाराजांच्या नावाने असलेल्या गेटसमोर कचरा दिसणं, याचा आपण सर्वांनी विचार करावा अशी गोष्ट आहे. स्वतः कचरा न टाकणे आणि इतरांनाही रोखणे हीच खरी शिवप्रेमाची खरी ओळख”.





