‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेतील सायली व अर्जुनची जोडी तर प्रेक्षकांची आवडती जोडी झाली आहे. सध्या मालिकेत सायली व अर्जुनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. तर एकीकडे सायली ही अर्जुनच्या प्रेमात आकंठ बुडाली असल्याचं पाहायला मिळतं. मालिकेत सध्या सायलीने प्रेमाची कबुली दिलेली पाहायला मिळतं आहे. त्यामुळे अर्जुन व सायलीच्या नात्याला कलाटणी मिळणार असल्याचं चित्र दिसत आहे. (Tharal Tar Mag Promo)
मालिकेत प्रियाने साक्षीच्या सांगण्यावरुन अर्जुन व सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य पूर्णा आजीला सांगितलेलं असतं. मात्र सायली देवासमोर शपथ घेत अर्जुनवरील प्रेमाची कबुली देत प्रियाला खोटं ठरविते. तर सायलीने सुभेदार कुटुंबासमोर प्रेमाची कबुली दिली असल्याने अर्जुन मनोमनी खूप खुश असतो. मात्र दोघांनी एकमेकांसमोर कबुली दिलेली नसते. आता लवकरच दोघंही एकत्र येणार आणि त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे हे कबूल करणार, असं वाटत असतानाच सायली व अर्जुनमध्ये दुरावा येणार असल्याचं एका प्रोमोमधून समोर आलं आहे.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, सायली व कुसुम बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटतात. त्यावेळी सायली कुसुमला सगळं काही मनातील सांगते. सायलीचं अर्जुनवर प्रेम आहे; पण अर्जुनचं तिच्यावर प्रेम नाही. असा सायलीचा गैरसमज होतो. मनातील सर्व भावना सायली कुसुमला सांगते. आणि ती रडू लागते. सायली कुसुमला म्हणते, “माझ्याही नकळत मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले; पण सरांच्या मनात माझ्याविषयी काहीही नाही”.
अर्जुनबाबतच्या गैरसमजामुळे सायलीच्या भावना दुखावल्या जातात. तर दुसरीकडे अर्जुन त्याच्या कारमध्ये बसून मोबाईलमधे सायलीचा फोटो पाहत रडत असतो. तेव्हा अर्जुन असं म्हणताना दिसतो की, “मला तुम्हाला घेऊन माझी बायको म्हणून मिरवायचं होतं. पण तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीही नाही, हे माझ्या आधीच लक्षात यायला पाहिजे होतं”. असं म्हणत तो सायलीचा फोटो मिठीत घेतो. अर्जुन व सायली यांनी एकमेकांवरील प्रेम लपवून ठेवल्याने त्यांच्यात खूप मोठे गैरसमज निर्माण झाले आहेत. आता दोघांमधील हे गैरसमज दूर होणार का?, दोघेही एकमेकांना प्रेमाची कबुली देणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.