‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका सध्या विशेष चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. पारू या गावाकडच्या मुलीची सहज सुंदर अशी कथा आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर यांची श्रीमंती या भोवती फिरणार कथानक मालिकेत पाहायला मिळत आहे. पारू व आदित्यच्या जोडीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. तर मालिकेत वजनदार अशा भूमिकेत अहिल्यादेवींचा करारीपणा प्रेक्षकांना विशेष भावतोय. सध्या मालिकेत आलेल्या रंजक वळणांमुळे साऱ्यांनाच मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता लागून राहिली. (Bharat Jadhav Entry In Paaru Serial)
अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना धमकीचा फोन आलेला असतो, तेव्हापासून त्या फार रागात असतात. त्यानंतर कालच्या भागात असं पाहायला मिळालं की, थेट अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या बेडरूमपर्यंत धमकी देणारा पोहोचतो. धमकी देणाऱ्या या इसमाने त्यांना शुभेच्छांचा पुष्पगुच्छ पाठवलेला असतो आणि त्याबरोबर एक पत्र देखील लिहिलेलं असतं ज्यात समोरच्या व्यक्तीने त्यांना धमकी दिलेली असते. ते पाहून अहिल्यादेवींचा संताप आणखी वाढतो. त्यावेळेला त्यांना लक्षात येतं की हे काम दुसरं तिसरं कोणाचं नसून माजी मंत्री सूर्यकांत कदम यांचं असणार आहे.
मालिकेत आयकर विभागाने किर्लोस्कर बंगल्यावर घातलेली धाडही पाहायला मिळाली. हे सगळं अहिल्यादेवींच्या डोळ्यासमोरुन जातं. दरम्यान मालिकेत माजी मंत्री म्हणून सूर्यकांत कदम या पात्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. अभिनेते भरत जाधव या मालिकेत सूर्यकांत कदम ही भूमिका साकारताना पाहायला मिळत आहेत. भरत जाधव यांच्या येण्याने मालिकेत कोणते ट्विस्ट येणार?, अहिल्यादेवी किर्लोस्कर आणि सूर्यकांत कदम यांच्यातील वैर मालिकेला कोणत वळण देणार?, हे पाहणं रंजक ठरेल.
आजवर अभिनेते भरत जाधव यांनी अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. शिवाय रंगभूमीवरही भरत जाधव यांचा खूप मोठा दबदबा असलेला पाहायला मिळाला. आता पारू या मालिकेतून भरत जाधव यांनी पुन्हा कमबॅक केलं आहे. त्यांची ही भूमिका मालिकेत कोणते ट्विस्ट आणणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.