Suraj Chavan Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : बिग बॉस मराठी ५ चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पाडला आहे. गेल्या काही दिवसांपासून सगळे मराठी प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत, तो क्षण अखेर पार पडला आहे. १०० दिवस चालणारा हा शो यंदा मात्र अवघ्या ७० दिवसांतच संपला. मात्र या ७० दिवसांतही या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. यंदाच्या पर्वाने ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सर्व रेकॉर्ड्स मोडले आणि नॉन-फिक्शनच्या शोमध्येही सर्वोच्च टीआरपी आणत बाजी मारली. अंकिता प्रभू वालावलर, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर आणि निक्की तांबोळी हे सहा जण ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचे अंतिम दावेदार बनले. या सहा जणांनीदेखील एकमेकांना टक्कर देत आपला इथपर्यंतचा पल्ला गाठला. (Bigg Boss Marathi Season 5 Winner Suraj Chavan)
नुकत्याच पार पडलेल्या महाअंतिम सोहळ्यात सर्वांच्या लाडक्या सूरज चव्हाणने बाजी मारली आणि ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. शोचा होस्ट रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी ५’च्या विजेतेपदाची घोषणा करत सूरज चव्हाणचे नाव जाहीर केलं आहे. सूरजला बिग बॉसच्या ट्रॉफीसह रोख रक्कम १४ लाख ६० हजार आणि ईलेक्ट्रिक बाइकही मिळाली आहे. मात्र त्याच्या या विजयावर काही प्रेक्षक कलाकार मंडळी नाखुश असल्याचे पाहायला मिळत आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या सूरजच्या प्रोमोखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कलर्स मराठीने शेअर केलेल्या प्रोमोखाली “सूरजने सहानूभुतीने हा शो जिंकला आहे. खरा विजेता तर अभिजीतच आहे”, “हे पर्व चांगले होते, स्पर्धकही चांगले होते. पण ‘बिग बॉस’ने घेतलेले निर्णय सर्वात वाईट होते, सूरज एक व्यक्ती म्हणून छान असला तरी घरात त्याहूनही चांगली पात्र माणसं होती जी प्रत्यक्षात खेळली होती” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसंच अभिनेत्री मिताली मयेकर व आरती सोलंकी यांनीदेखील सूरजच्या विजयावर उपहासात्मक पोस्ट शेअर केल्या आहेत. आरतीने पोस्ट शेअर करत “मी गरीब आहे” असं म्हटलं आहे तसंच “छपरीपणा सुरु करायला हवा” असं म्हटलं आहे. तसंच मितालीने ‘सहानुभूती शो आहे की रिअॅलिटी शो आहे’ अशी पोस्ट शेअर केली आहे.

या कमेंट्सबरोबरचं अनेकांनी निक्की, अंकिता, डीपी व अभिजीत यांच्या खेळाचेही कौतूक केलं आहे. दरम्यान, शोचा विजेता झाल्यानंतर सूरजने ““मी बोललो होतो ट्रॉफी मीच जिंकणार, माझी जिद्द होती आणि माझा विश्वास होता आणि टी ट्रॉफी मी जिंकली आहे. ॐ नम: शिवाय, आई मरी माता, हर हर महादेव, मला माहीत होतं अभिदादा माझ्याबरोबर शेवटपर्यंत असणार” या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.